नवी दिल्ली: ( Prime Minister Narendra Modi on Jain literature ) “जैन साहित्य हा भारताच्या बौद्धिक वारशाचा आधार आहे आणि हे ज्ञान जतन करणे आपले कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार, दि. ९ एप्रिल रोजी केले आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात नवकार महामंत्र दिनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
जैन धर्मात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संवेदनशीलता दोन्ही आहे आणि त्याच्या मुख्य तत्त्वांद्वारे युद्ध, दहशतवाद आणि पर्यावरणीय समस्यांसारख्या जागतिक आव्हानांवर उपाय दिले जातात. ते म्हणाले की, “जैन परंपरेचे प्रतीक, जे ‘परस्परोपग्रहो जीवनम्’ म्हणते, ते सर्व सजीवांच्या परस्परावलंबनावर भर देते. जैन धर्माची अहिंसेप्रति असलेली वचनबद्धता, अगदी सूक्ष्म पातळीवरही, पर्यावरण संरक्षण, परस्पर सौहार्द आणि शांतीचा एक गहन संदेश अधोरेखित करतो. जैन धर्माच्या पाच प्रमुख तत्त्वांचा स्वीकार हा आजच्या युगात अनेकांतवादाच्या तत्त्वज्ञानाच्या प्रासंगिकतेचे महत्त्व अधोरेखित करतो,” असे पंतप्रधान म्हणाले.
रत्नत्रय, दशलक्षण, सोलाहकरण आणि पर्युषण यांसारख्या सणांसह जैन धर्माच्या तत्त्वांचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की “हे सण आत्मकल्याणाचा मार्ग मोकळा करतात. ‘जागतिक नवकार मंत्र दिन’ जागतिक स्तरावर आनंद, शांती आणि समृद्धीला चालना देत राहील,” असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी चारही समुदाय एकत्र आल्याबद्दल समाधान व्यक्त करताना त्यांनी ते एकतेचे प्रतीक असल्याचे सांगितले.