मुंबई : (MLA Sanjay Upadhyay on Swatantryaveer Savarkar ) भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील क्रांतिकारकांचे मुकुटमणी, द्रष्टे समाजसुधारक, प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना 'भारतरत्न' देऊन सन्मानित करावे, अशी मागणी बोरीवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी गुरुवार, दि. ६ मार्च रोजी विधानसभेत केली.
विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना संजय उपाध्याय यांनी विविध मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. आपल्या पहिल्याच भाषणात उपाध्याय यांनी प्रभावीपणे आपली मते व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अद्याप भारत सरकारने 'भारतरत्न' दिला नाही, याबद्दल खेद व्यक्त करत राज्य शासनाकडून यासाठी प्रयत्न करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
उपाध्याय यांनी पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची आठवण शासनाला करून दिली. देशात कोणत्याही आपत्तीच्या वेळी पुढे येऊन मदत करणाऱ्या आणि कुठेही त्याची प्रसिध्द्धी न मिळवणाऱ्या 'आरएसएस'चे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त 'आरएसएस' या महान संस्थेचा राज्य शासनाने गौरव करावा, अशी मागणीही उपाध्याय यांनी फडणवीस सरकारकडे केली.
दिव्यांगांसाठी उठवला आवाज
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या व्यथाही आ. संजय उपाध्याय यांनी शासन दरबारी मांडल्या. दिव्यांग विद्यार्थ्यांना शासन स्तरावर ओळखपत्र मिळवण्यासाठी खेटे मारावे लागतात. याची दखल घेऊन शासनाने दिव्यांग शाळेत किंवा त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांकडे जावून ओळखपत्रे वितरित करावे आणि त्यांना दिलासा द्यावा, अशी तिसरी महत्त्वाची मागणी उपाध्याय यांनी विधानसभेत केली.