पायाभूत प्रकल्प, कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो, वाढवण बंदर हे सुशासनाचे प्रतिक ; देवेंद्र फडणवीस

    13-Mar-2025
Total Views |

Devendra Fadanvis on symbols of good governance
 
मुंबई: ( Devendra Fadanvis on  symbols of good governance ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे 'टायकॉन मुंबई 2025 : इंडियाज लिडिंग आंत्रप्रेन्युअरल लीडरशिप समिट' कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पायाभूत सुविधांचा विकास, गुंतवणूक आणि जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल 'टीआयई मुंबई हॉल ऑफ फेम' पुरस्कार इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे थेट परकीय गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनले आहे. केवळ नऊ महिन्यांत ₹ 1,39,000 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. स्टार्टअप्सच्या संख्येत आणि गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र नवीन विक्रम प्रस्थापित करत असल्याने आता भारताची नवी स्टार्टअप राजधानी महाराष्ट्र आहे.
 
'टीआयई मुंबई हॉल ऑफ फेम' हा पुरस्कार महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना समर्पित करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हा पुरस्कार 2014 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुरू केलेल्या कामाची पोचपावती आहे. महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई आणि ‘एमएमआर’ क्षेत्रात दिसणारे सर्व पायाभूत प्रकल्प, कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो, वाढवण बंदर हे सुशासनाचे प्रतिक आहेत.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वाढवण बंदर जेएनपीटी बंदराच्या तुलनेत तीनपट मोठे असेल, जे भारतातील एक मोठे बंदर आहे. या बंदराचे काम सुरू करण्यात आले असून ते फक्त बंदर नसेल, तर त्याच्याबरोबरच एक विमानतळ देखील उभारले जाईल. त्याठिकाणी बुलेट ट्रेन स्टेशन असेल. वाढवण बंदराच्या परिसरात चौथी मुंबई साकारली जाईल.
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून 25,000 गावे दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठरवले आणि लोकसहभागाच्या जोरावर या अभियानातून 2019 पर्यंत 20,000 गावांनी जलसंधारणाचे नियोजन केले, जलसाठ्याची निर्मिती केली आणि दुष्काळमुक्त झाली. या योजनेमुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्यातही भूजल पातळी वाढली. यावेळी टीआयई मुंबईचे संस्थापक अध्यक्ष हरीश मेहता, हवस मीडिया इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय मोहन, टीआयई मुंबईचे अध्यक्ष रानू वोहरा, डॉ. अपूर्व रंजन शर्मा व इतर मान्यवर उपस्थित होते.