अशोक सराफ आणि निवेदिताच्या मैत्री पासुन प्रेमापर्यंतच्या प्रवासाला 'या' लवगुरुची साथ, म्हणाले "बनवाबनवी च्या सेटवर लागली यांच्या प्रेमाची चाहूल अन्..."
12-Mar-2025
Total Views |
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत अनेक संस्मरणीय जोड्या आहेत, त्यातली अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची जोडी खास मानली जाते. चार दशके या जोडीनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मात्र, या नात्यामागे संघर्ष, समजूतदारपणा आणि एका जिवलग मित्राची महत्त्वाची भूमिका होती, हे फारच कमी लोकांना माहीत आहे. अशोक आणि निवेदिताच्या प्रेमकथेचा प्रारंभ सहज घडला नाही. दोघांमध्ये वयानुसार अंतर होतं, घरच्यांचा विरोध होता, पण दोघांचं नातं दृढ होत गेलं. या नात्यात एका व्यक्तीनं महत्त्वाची भूमिका बजावली आणि ते म्हणजे त्यांचे खास मित्र सचिन पिळगांवकर.
प्रेमाची गुपितं आणि सचिन पिळगांवकरांचा सल्ला:
सचिन पिळगांवकर यांनी नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितलं, “अशोक लग्नाच्या कल्पनेलाच नकार देत होता. त्याच्या अपघातानंतर तो कामात व्यग्र राहणं पसंत करत होता. त्याला असं वाटायचं की लग्न करायचं कारणच नाही. पण निवेदिता मात्र त्याच्याशीच संसार थाटायच्या निर्णयावर ठाम होती. तिच्या घरच्यांनीही या नात्याला विरोध केला होता. त्यावेळी मी आणि सुप्रिया (सुप्रिया पिळगांवकर) याने मध्यस्थी केली.”
सचिन यांच्या आठवणींनुसार, *'अशी ही बनवाबनवी'*च्या सेटवर एक छोटासा प्रसंग घडला आणि त्यावरून त्यांना दोघांच्या प्रेमाची चाहूल लागली. “डान्स रिहर्सल दरम्यान मी अचानक पडलो, आणि त्याक्षणी निवेदिता घाबरून 'अशोक... काय झालं?' असं म्हणाली. मी आश्चर्यानं सुप्रियाकडे पाहिलं आणि तिनं हसून होकारार्थी मान हलवली. तेव्हाच मला खात्री पटली की इथं काहीतरी वेगळं सुरू आहे!”
३५ वर्षांचं सहजीवन आणि यशस्वी प्रवास
अखेर २७ जून १९८९ रोजी अशोक आणि निवेदिताचं लग्न झालं. संघर्ष, प्रेम आणि जिवलग मित्राचा सल्ला यांच्या आधारावर उभं राहिलेलं हे नातं आज ३५ वर्षं पूर्ण करत आहे.
नुकताच निवेदिता सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला, तर अशोक सराफ यांना पद्मश्री जाहीर झाला आहे. या यशस्वी प्रवासामागचं खरं गुपित म्हणजे त्यांचं निखळ प्रेम आणि मैत्रीचा मजबूत पाया!