सत्य प्रस्थापित करण्यासाठी समर्पित शिरीष महाराज मोरे

08 Feb 2025 21:15:21

शिरीष महाराज मोरे
 
बुधवार दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी एका दूरध्वनीमुळे जगद्गुरू तुकोबारायांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांच्या निधनाचे वृत्त समजले. कालपरवापर्यंत नियमित संपर्कात असलेले शिरीष महाराज वयाच्या अवघ्या तिशीत स्वतःचे जीवन संपविण्याचा मार्ग स्वीकारतील, यावर प्रथमतः विश्वास बसेना. पुण्यात अंत्यविधीसाठी पोहोचत असताना असंख्य विचारांचा आणि आठवणींचा कल्लोळ उठला होता. राज्यभरातील संघ आणि ‘शिवशंभू विचार मंचा’च्या कार्यकर्त्यांचा ओघ देहूकडे सुरू झाला. पवित्र हिंदू धर्माचे काम करणारे कार्यकर्ते दुःखाच्या सागरात बुडाले असताना त्यांच्या संस्थांची बदनामी डाव्या मंडळींनी निर्लज्जपणे सुरू केली. या दुःखद प्रसंगातून सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःला सावरून पुढील मार्गक्रमण करावे, यासाठी शिरीष महाराजांच्या कर्तृत्वाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न...
उसळत्या रक्तात मा
ज्वालामुखीचा दाह दे,
वादळाची दे गती
पण भान ध्येयाचे असू दे...
 
शिरीष महाराजांचा जन्म दि. 19 मे 1994 रोजी पुणे जिल्ह्यात वढू बुद्रुक येथे झाला. लहानपणापासून घरातील वातावरणामुळे त्यांचा संघाशी संबंध आला. देशभक्ती, त्याग, चारित्र्य यासंबंधीच्या संस्कारांमुळे त्यांनी पूर्ण वेळ संघाचे काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांची नियुक्ती कोल्हापूर जिल्ह्यात करण्यात आली. तिथे त्यांनी अल्पावधीत अनेक तरुणांना संघकार्याशी जोडले. दोन वर्षे काम केल्यानंतर पुन्हा देहूत येऊन सामाजिक कार्यास सुरुवात केली. त्याच सुमारास त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका’वर पुस्तक लिहिले. त्याच्या प्रकाशनाच्या निमित्ताने माझा त्यांच्याशी परिचय झाला. तो उत्तरोत्तर वृद्धिंगत होत गेला. 
  
‘शिवशंभू विचार मंचा’च्या कामात 15 ते 30 वर्षांची पिढी असावी, म्हणजे ते दीर्घकाळ काम करू शकतील, असा विचार करण्यात आला होता. याप्रमाणे संघटनात्मक बांधणी करीत असताना शिरीष महाराजांनी असंख्य युवकांना कामात जोडले. त्यातून युवा वक्ते आणि लेखक मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. त्याचबरोबर प्रसारमाध्यमे आणि शिवप्रेमी संस्थांना जोडण्यासाठी त्यांनी जिल्ह्याजिल्ह्यांत रात्रंदिवस प्रवास केला. प्रवासात आणि अन्य वेळी रात्री उशिरापर्यंत या तरुणांबरोबर महाराजांच्या चर्चा चालू असायच्या. या काळात त्यांनी असंख्य बैठका घेतल्या. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज आपल्या गावात येऊन छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगत आहेत, त्यातील खरा आणि खोटा किंवा विपर्यस्त इतिहास सप्रमाण मांडत आहेत, याचे सर्वांना कौतुक वाटायचे. हळूहळू गावागावांत मधाळ आणि लाघवी शिरीष महाराजांच्या भोवती ‘शिवशंभू विचार मंचा’चे संघटन उभे राहिले. ब्रिगेडी इतिहास विषयक खोट्या प्रचाराला सप्रमाण पुरांव्यानिशी उत्तर मिळू लागले. खरा इतिहास समाजापुढे येऊ लागला. ‘शिवशंभू विचार मंचा’च्या वार्षिक कार्यशाळेला पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने युवा अभ्यासक, वक्ते आणि लेखक येऊ लागले.
 
याच काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ‘गड जिहाद’चा विषय पुढे आला. किल्ल्यांवरील अतिक्रमणांची अनेक प्रकरणे उजेडात येऊ लागली. सरकारने प्रतापगडावरील अफजलखानाच्या थडग्याचे अनधिकृत बांधकाम पडले. याच मालिकेत विशाळगडावरील अनधिकृत बांधकामांचा विषय ऐरणीवर आला. तेव्हा शिरीष महाराजांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन उभे राहिले. सरकारला दखल घेऊन अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी लागली. स्वार्थापोटी किंवा सोयीने स्वतःला ‘शिवप्रेमी’ म्हणविणार्‍या डाव्या आणि ब्रिगेडी मंडळींची दुटप्पी भूमिका समाजासमोर आली. विशाळगडावरील अतिक्रमणांच्या विरोधात आंदोलन करणार्‍यांना ‘अतिरेकी’ संबोधण्यापर्यंत त्यांची मजल गेली. या प्रकरणात असंख्य तरुणांना शिरीष महाराजांमुळे अन्यायाच्या विरोधात लढण्याची प्रेरणा मिळाली.
 
इतिहास विषयक अनेक दिनविशेष साजरे करण्यासाठीचे उपक्रम शिरीष महाराजांच्या प्रेरणेने सुरू झाले. त्यानिमित्ताने वक्ते आणि लेखक सक्रिय झाले, अस्सल साधनांच्या आधारे संदर्भ आणि पुरावे शोधून कार्यक्रमात मांडू लागले. या कार्यक्रमांना साहाय्य करण्यासाठी समाजातील अनेक संस्था पुढे आल्या. ‘शिवराय समजून घेताना’ यासारखी पुस्तके स्वतः लिहिण्याबरोबरच त्यांनी अनेक युवा लेखकांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या पुस्तकांचा छपाई आणि प्रकाशनाचा खर्च ‘हिंदू युवा प्रबोधिनी’च्या माध्यमातून करण्यात आला. अगदी दोन-तीन वर्षांच्या कालावधीत सुमारे 20 पुस्तकांचे प्रकाशन झाले. तरुण लेखकांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमांनाही सभागृह तुडूंब भरले जाऊ लागले. आजची स्थिती अशी आहे की, लेखन पूर्ण झालेली सुमारे 20 पुस्तके प्रकाशनाच्या प्रतिक्षेत आहेत, पण त्यांना प्रोत्साहन देणारा काळाच्या पडद्याआड गेला आहे.
 
2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत खोटे विमर्श प्रस्थापित केले गेले. त्यांच्यामुळे हिंदू समाज काही काळासाठी भ्रमित झाला. त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणूक आली. अशा वेळी ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’, ‘गड जिहाद’, वारीमधील वैचारिक प्रदूषण यांसारख्या गोष्टींविषयी हिंदू समाज जागृतीचे व्रत शिरीष महाराजांनी हाती घेतले. त्यासाठी निरंतर प्रवास करून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. या काळात त्यांच्या गाडीचा मोठा अपघात झाला. एअर बॅग वेळीच उघडल्याने महाराज वाचले. परंतु, एअर बॅगचा फटका बसल्याने त्यांचे तोंड सुजले होते. त्याही परिस्थितीत त्यांनी केवळ दोन दिवसांची विश्रांती घेऊन प्रवास चालू केला. याच काळात त्यांच्या पायाच्या अंगठ्याला जखम झाली होती. प्रत्येक नवीन गावात संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून सर्व नागरिक त्यांचे पाय धुवायचे आणि पाया पडायचे. त्यामुळे जखम न वाळता सारखी चिघळत गेली आणि ती पूर्ण बरी होण्यास वेळ गेला. या काळात जखमेमुळे चपला घालता येत नव्हत्या आणि वेदना होत होत्या. परंतु, शिरीष महाराजांनी त्याची कधी कुरकुर केली नाही.
 
खरा विमर्श प्रस्थापित करण्याचे काम आवश्यकतेप्रमाणे केल्यानंतर शिरीष महाराज पुन्हा ‘शिवशंभू विचार मंचा’च्या कामाकडे वळले. यावर्षी ‘शिवशंभू विचार मंचा’ची वार्षिक कार्यशाळा देहू येथे घ्यावी, असा विचार झाला, तेव्हा त्यांनी पुढाकार घेऊन देहूतील गाथा मंदिरात सर्व व्यवस्था उभ्या केल्या. त्याचबरोबर सर्वांसाठी वारीतील वैचारिक प्रदूषणावर प्रभावी सादरीकरण केले. या सादरीकरणात तुकाराम महाराजांच्या आणि अन्य संतांच्या ओव्यांचे चुकीचे किंवा सोयीस्कर अर्थ लावून डावी मंडळी भोळ्या वारकरी समाजात कसे भ्रम पसरवत आहेत, हे त्यांनी लक्षात आणून दिले. तसेच नेमके सत्य कथन काय आहे, ते सप्रमाण मांडले.
सुमारे चार महिने झंजावाताप्रमाणे प्रवास करून हिंदू समाज प्रबोधन करणारे शिरीष महाराज विधानसभा निवडणूक निकालानंतर काहीसे अलिप्त झाले. त्यांच्या बोलण्यात काही वेळा नैराश्यही जाणवले. त्यातून आमची अनेक वेळा प्रत्यक्ष आणि फोनवर चर्चा झाली. त्यांची मनस्थिती पूर्वव्रत झाल्याचे बोलण्यातून जाणवले. विविध उपक्रम, संघटनवाढीची योजना, नवीन व्यवसायाची रचना अशा अनेक गोष्टी आम्ही बोललो. परंतु, आपल्या मनात एक मोठी खळबळ चालू आहे, याचा कोणालाच थांगपत्ता लागू न देता, त्यांनी आपले आयुष्य संपविण्याचा मार्ग निवडला.
 
इतरांना संघर्ष करण्याची आणि दीर्घकाळ काम करण्याची प्रेरणा देणारे शिरीष महाराज आज तरुणांना पोरके करून गेले. महाराष्ट्रातील युवा कार्यकर्त्यांना इतका निरागस, लाघवी, मनमिळाऊ संघटक आपल्यात राहिला नाही, हे वास्तव स्वीकारणे जड जात आहे. शिरीष महाराजांच्या अंत्ययात्रेला लोटलेल्या जनसागरातून याची प्रचिती आली. आपल्या गावातील एक तरुण कीर्तनकाराने राज्यभर फिरून किती लोक जोडले होते, याचे प्रत्यंतर देहूवासीयांना त्या दिवशी आले. अवघ्या 30 वर्षांच्या आयुष्यात हा युवक 60-70 वर्षांचे काम करून गेला. ‘विकसित व्हावे, अर्पित होऊनी जावे’ या काव्यपंक्तीचा प्रत्यय त्यांनी आणून दिला.
 
समाजात सत्य प्रस्थापित करण्यासाठी आणि इतिहासाचे विकृतीकरण थांबविण्यासाठी शिरीष महाराजांनी आपले आयुष्य वेचले. यासाठीची त्यांची तळमळ अनेक सहकार्‍यांनी अनुभवली आहे. तेव्हा शिरीष महाराजांना श्रद्धांजली अर्पण करीत असताना त्यांच्याप्रमाणे अभ्यास करणे, व्यासंग वाढवणे, लोकसंग्रह करणे, संघटन करणे, प्रवास करणे या गुणांचे अनुकरण करून समाजात सत्य प्रस्थापित करण्याची जबाबदारी आजच्या युवकांवर आणि शिवप्रेमींवर आहे. त्यासाठी आपण एकदिलाने कार्यरत राहूया.
 
सुधीर थोरात 
(लेखक ‘शिवशंभू विचार मंचा’चे महाराष्ट्र राज्य संयोजक आहेत.)
Powered By Sangraha 9.0