“मुख्यमंत्र्यांना सल्ला देण्याच्या फंदात संजय राऊतांनी पडू नये”; प्रविण दरेकरांचे प्रत्युत्तर

06 Feb 2025 14:51:28

pravin darekar 
 
मुंबई : (Pravin Darekar) उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी राहायला का जात नाही, अशा प्रकारचे विधान केले होते. त्याला भाजप विधानपरिषद गटनेते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांच्यासारख्या महान सल्लागाराच्या सल्ल्याची आवश्यकता नाही. ते स्वतः निर्णय घ्यायला सक्षम आहेत. संजय राऊत वास्तुशास्त्रज्ञ किंवा ज्योतिषी असतील त्यांनी तो धंदा करावा. मुख्यमंत्र्यांना सल्ला देण्याच्या फंदात पडू नये, असे प्रविण दरेकर म्हणाले.
 
माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याची दरेकर यांनी चिरफाड केली. ते म्हणाले कि, “संजय राऊत दिल्लीत किती जागा लढवताहेत माहित नाही. जिथे आपले अस्तित्व नाही, उमेदवार नाही, आयजीच्या जीवावर बायजी उधार असेच संजय राऊत यांचे चालू आहे. दिल्लीत त्यांचा संबंध काय? पराभव त्यांना समजून आलेला आहे. त्या पराभवाचे विश्लेषण त्यांनी आतापासूनच करायला सुरुवात केलीय. काँग्रेस आणि आपची ते काळजी करताहेत मग शिवसेनेचे काय? त्यांनी उबाठा भक्कम, सक्षम करण्याची काळजी घ्यावी. परंतु ते शरद पवारांसाठी कामं करताहेत, असे राऊत यांच्या वक्तव्यातून दिसून येतेय.”
 
दिल्लीत पार पडलेल्या निवडणुकीवर बोलताना दरेकर म्हणाले कि, “दिल्लीत शंभर टक्के भाजपचे सरकार येणार आहे. कारण दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून देशभरात जो कारभार सुरू आहे त्याचे पडसाद निश्चितच चांगल्या पद्धतीने उमटताहेत आणि केजरीवालांची प्रतिमा अनेक प्रकारच्या आरोपांनी पूर्णपणे मलिन झालीय. अशावेळी केंद्रात भाजप आणि एनडीएचे सरकार असताना दिल्लीतही आमचे सरकार आले तर डबल इंजिन सरकार आणखी गतीने दिल्लीचा चेहरामोहरा बदलेल”, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.
 
लाडकी बहीण योजनेवर बोलताना दरेकर म्हणाले कि, “विरोधकांना सरकारवर टीका करण्यासारखे काहीच नाही म्हणून लाडक्या बहिणींचा आधार घेत आहेत. परंतु लाडक्या बहिणींची काळजी आमचे महायुतीचे सरकार, भाऊ घेतील. कुठल्याही लाडक्या बहिणींवर अन्याय होणार नाही. चुकीच्या पद्धतीने जे योजनेत समाविष्ट झाले असतील त्याची चौकशी होऊ शकते.”
 
मनोज जरांगे - पाटील यांच्या वक्तव्यावर दरेकर म्हणाले कि, लोकशाहीत संचार आणि भाषण स्वातंत्र्य आहे. धारेवर का आणि कशासाठी धरायचे हे त्यांचे त्यांनाच माहित. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या अनेक योजना आणल्या. सारथी, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लाखो मराठा समाजाच्या तरुण-तरुणींना ताकद दिली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एसईबीसीचे आरक्षणही दिले आणि ते टिकलेही. आता जरांगेंच्या आंदोलनात मुद्दाच राहिलेला नाही, अशी टिकाही दरेकरांनी केली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0