महाकुंभात होणार जनजाती अस्मिता रक्षणाची सिंहगर्जना!
दि. ६ ते १० फेब्रुवारी दरम्यान वनवासी कल्याण आश्रमातर्फे भव्य जनजाती संमेलन
04-Feb-2025
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Janajati Sammelan in Mahakumbh) प्रयागराज येथे सुरु असलेल्या ऐतिहासिक महाकुंभामध्ये दि. ६ ते १० फेब्रुवारी दरम्यान 'भव्य जनजाती संमेलन' आयोजित करण्यात आले आहे. देशभरातील सुमारे २५ हजार जनजाती बांधव या संमेलनात धर्म, संस्कृती आणि परंपरा यांचे रक्षण करण्याचा संकल्प करणार असल्याची माहिती वनवासी कल्याण आश्रम तर्फे देण्यात आली. हे वर्ष जनजाती अस्मितेचे नायक भगवान बिरसा मुंडा यांचे १५० वे जयंती वर्ष आहे. योगायोगाने याच वर्षी हा ऐतिहासिक महाकुंभ येत असल्याने कुंभमेळ्यातील या संमेलनाला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
याचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा 'युवा कुंभ'चे आयोजन करण्यात आले आहे. दि. ६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या कुंभात देशभरातील १० हजार जनजाती तरुण सहभागी होणार आहेत. याच कार्यक्रमात निवडक २० प्रतिभावान तरुणांनाही सन्मानित केले जाईल. दि. ७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेली भव्य शोभायात्रा या कुंभाचे वेगळे वैशिष्ट्य ठरणार आहे. ज्यामध्ये देशभरातून येणारे जनजाती बंधू आणि भगिनी आपल्या पारंपारिक पोशाखात आणि नृत्याचा आनंद घेत कुंभस्नान करणार आहेत. देशभरातील विविध जनजातींमधील सुमारे १५० नृत्य पथके या संमेलनात सहभागी होणार असून आपल्या पारंपारिक नृत्य - संगीताचे चार विविध मंचांच्या माध्यमातून प्रदर्शन करणार आहेत. हे सांस्कृतिक कार्यक्रम ७, ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी होतील.
दि. १० फेब्रुवारी रोजी संत संमेलनाचे आयोजित केले आहे. ज्यामध्ये विविध प्रांतातून येणारे जनजाती समाजातील प्रमुख संत धर्म आणि संस्कृतीबद्दल विचार मंथन करतील. या संमेलनामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी महामंडलेश्वर स्वामी यतिंद्रानंद गिरीजी महाराज, स्वामी अवधेशानंद गिरी जी, आचार्य महामंडलेश्वर रघुनाथ महाराज (फरशीवाले बाबा) आणि इतर प्रमुख संत उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाशी संलग्न उत्तर प्रदेशातील सेवा समर्पण संस्थेचे कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक प्रयत्न करत आहेत.
प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी प्रयत्नशिल
अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम देशभरातील १२ कोटी वनवासी बांधवांच्या धर्म, संस्कृती आणि परंपरा यांच्या रक्षणासोबतच वनवासी क्षेत्रात विविध सेवाकार्ये चालवत आहे. गेल्या काही वर्षांपासून, कल्याण आश्रम देशभरात आयोजित विविध कुंभामेळ्यांमध्ये जनजाती बांधवांना एकत्र करून त्यांना आपल्या प्राचीन संस्कृतीचे भव्य दर्शन घडविण्यासाठी सतत प्रयत्नशिल आहे. आतापर्यंत नाशिक, उज्जैन, प्रयागराज सारख्या कुंभांमध्ये जनजाती बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत आला आहे.