मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Virat Shakha Darshan Latur) समरस समाज व जागृत नागरिक घडवेल 'विश्वगुरू भारत', असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी व्यक्त केला. संघ स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित 'विराट शाखा दर्शन' हा ऐतिहासिक कार्यक्रम रविवार, दि.२ जानेवारी रोजी सायं ५ ते ७ या वेळेत लातूर येथील राजस्थान विद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. शहरातील ६१ वस्त्यातील ६३ शाखा एकाच वेळी एकाच मैदानावर उभ्या पहायला मिळाल्या. यात विद्यार्थी, तरुण, व्यवसायिकांच्या शाखांचा समावेश होता.
हे वाचलंत का? : वसंतपंचमीनिमित्त पंढरपूरात विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा संपन्न!
संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होत असताना, संघाच्या कार्याच्या विस्तारासाठी पंच परिवर्तन या योजनेला महत्व दिलं जात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून संघाचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक हे या आयोजनासाठी तयारी करत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लातूर शहर कार्यवाह किशोर पवार यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महादेव डमणे, देवगिरी प्रांत संघचालक अनिलजी भालेराव लातूर शहर संघचालक उमाकांत मद्रेवार उपस्थित होते.
यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना दत्तात्रेय होसबळे म्हणाले, शाखेमध्ये आल्यामुळे मन, शरीर बुद्धी सुदृढ होते, विकास होतो. परिपूर्ण नागरिकाची निर्मिती या एक तासाच्या शाखेतून होत असते. प्रत्येक वस्तीत बालशाखा, तरुण शाखा, प्रौढ शाखा झाल्या पाहिजेत. प्रत्येक क्षेत्रात सामाजिक जाणीव असलेल्या बांधवाना संघ शाखात जोडणे आवश्यक आहे.
शताब्दी वर्षात पंच परिवर्तन संकल्पनेवर विशेष भर दिला गेला असून या संकल्पनेत समरसता, नागरिक कर्तव्य, स्वदेशी, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या संकल्पनेचा मुख्य उद्देश समाजात एकात्मता आणि समृद्धी घडवणे असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला जिल्ह्यातून मोठया संख्येने महिला भगिनी, नागरिक, व्यापारी उपस्थित होते.