सांगली : विधानसभा निवडणूकीनंतर अनेकांकडून ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली असतानाच आता सांगली जिल्ह्यातील बहे गावातील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर बहिष्कार टाकला आहे. त्यांच्याकडून मतपत्रिकेवर निवडणूका घेण्याचा ठराव करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर विरोधकांकडून सातत्याने ईव्हीएम मशीनवर आरोप करण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएम मशीनवर आपल्या पराभवाचे खापर फोडत त्यावर शंका उपस्थित केली. त्यानंतर आता सांगलीतील बहे गावातील ग्रामस्थांनी ग्रामसभा घेत सगळ्या निवडणूका मतपत्रिकेवर घेण्याबाबत ठराव केला आहे. या ठरावाची प्रत त्यांनी इस्लामपूरच्या तहसीलदारांकडे सुपूर्द केली. शिवाय सांगली जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी असे ठराव करण्याचे आवाहनही ग्रामास्थांनी केले आहे.