आपले सरकारच्या ५०० सेवा आता व्हॉट्सअँपवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
28-Feb-2025
Total Views | 84
1
मुंबई: ( Devendra Fadnavis ) आपले सरकार पोर्टलवरील ५०० सेवा आता व्हॉट्सअँपवर उपलब्ध होणार आहे. त्याबाबत मेटा शी करार करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी केली. या माध्यमातून महाराष्ट्रात ‘व्हॉट्सअँप गव्हर्नन्स’चा नवा अध्याय सुरू होत असल्याचे ते म्हणाले.
वांद्रे कुर्ला संकुलात आयोजित ‘मुंबई टेक वीक २०२५’च्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी ‘आपले सरकार’ व्हॉट्सअँप चॅटबॉट संदर्भात ‘मेटा’सोबत सामंजस्य करार करण्यात आला. त्याचबरोबर एमएमआरडीए आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांच्यातही सामंजस्य करार करण्यात आला. ‘एमएमआरडीए’ने ‘एन.पी.सी.आय’ला बीकेसीमध्ये त्यांच्या जागतिक मुख्यालयाच्या उभारणीसाठी भूखंड प्रदान केला. तसेच कौशल-रोजगार-उद्योजकता- नाविन्यता विभाग आणि ‘टीम’सोबत नॉलेज ‘एआय हब’ संदर्भात सामंजस्य करार झाला. उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक संग्रहालयाची स्थापना केली जाणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
राज्यात मोबाईल फोनचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला आहे. आतापर्यंत ऑनलाइन सेवा उपलब्ध असूनही काही नागरिक ऑनलाइन प्रक्रियांपासून दूर राहायचे. मात्र, व्हॉट्सअँपचा सहज आणि सर्वदूर वापर पाहता, आता शासनाच्या महत्त्वाच्या सेवांचा लाभ थेट व्हॉट्सअँपद्वारे घेता येणार आहे. या नव्या सुविधेमुळे महाराष्ट्रात ‘व्हॉट्सअँप गव्हर्नन्स’चा नवा अध्याय सुरू होत आहे. या नव्या योजनेमुळे नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि वेगवान सेवा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
‘मुंबई टेक वीक’च्या उद्घाटन प्रसंगी ऋषी दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जियो कन्वेंशन सेंटर येथे मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचे भविष्यातील रोडमॅप आणि राज्य सरकारच्या तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती दिली. “महाराष्ट्र शासनाच्या धोरणांमुळे राज्य हे देशाच्या स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर आहे. जेव्हा आपण ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहतो, तेव्हा तंत्रज्ञान हा विकासाचा मुख्य आधारस्तंभ असतो. फिनटेक आणि एआय क्षेत्रातील स्टार्टअप्सला गती देण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करत आहे”, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले
पाच वर्षांचा रोडमॅप काय?
- आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र सरकार तीन मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रीत करणार आहे. यात वाढवण बंदर हा प्रकल्प मुंबईच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडविणारा आहे. हा पोर्ट सध्याच्या जेएनपीटी पेक्षा तीनपट मोठा असून, २० मीटर खोल बंदर असल्यामुळे जगातील सर्वात मोठी जहाजे येथे थांबू शकतील. भारताला जागतिक सागरी व्यापारात महत्त्वाचे स्थान मिळवून देणारा हा बंदर प्रकल्प असेल.
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नव्या स्मार्ट सिटीच्या उभारणीवर लक्ष केंद्रित करणार आहे. हे विमानतळ पूर्ण झाल्यावर आजूबाजूला एक नवीन व्यापारी आणि तंत्रज्ञान केंद्र विकसित केले जाणार आहे. ही नवी शहरे मुंबईच्या तुलनेत तीनपट मोठी असतील आणि उद्योगांसाठी उत्तम संधी उपलब्ध करतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
- नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा आणि गोदावरी जलप्रकल्प हाती घेतले जात आहेत. या प्रकल्पांमुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा होईल आणि शेती उत्पादन वाढणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
नवी मुंबई नवे ‘आयटी हब’
- राज्यातील सायबर सुरक्षा उपाययोजना संदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जगभरातील गुन्हेगारी सायबर जगतात शिफ्ट होत आहे. भविष्यात ७० टक्के गुन्हे हे सायबर गुन्हे असतील. त्यामुळे नवी मुंबईत भारतातील सर्वात आधुनिक सायबर सुरक्षा केंद्र उभारले आहे. सर्व बँका, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यांना या यंत्रणेशी जोडले असल्याने आता कोणत्याही आर्थिक फसवणुकीवर तत्काळ कारवाई केली जाणार आहे.
- २००० ते २०१४ दरम्यान महाराष्ट्रात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गुंतवणूक कमी झाल्यामुळे अनेक आयटी कंपन्या बंगळुरू आणि हैदराबादकडे वळल्या. मात्र, अटल सेतूसारख्या प्रकल्पांमुळे नवी मुंबई आता एक नवे तंत्रज्ञान केंद्र बनत आहे. आजच्या मुंबईत व्यावसायिक जागांची कमतरता असल्यामुळे नवी मुंबई, नवीन ठाणे आणि वाढवण येथे नवीन शहरे उभारली जाणार आहे. त्यामुळे उद्योगांना अधिक जागा उपलब्ध होईल आणि मुंबईतील दडपण कमी होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.