"महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार मिळणे हे सौभाग्य"
सत्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
12-Feb-2025
Total Views | 39
नवी दिल्ली : (DCM Eknath Shinde) "महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्राप्त होणे हे माझे सौभाग्य असल्याचे मी समजतो", असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त 'महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार' सोहळयाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.
एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व शिंदेशाही पगडी असे आहे. पुरस्काराची पाच लाख रुपयांची रक्कम आणि स्वतःकडून पाच लाख असे दहा लाख रुपये 'सरहद' संस्थेला देत असल्याचे शिंदे यांनी मंचावरून जाहीर केले.
शिंदे पुढे म्हणाले, "महादजी शिंदे यांचे कर्तृत्व रणांगणावर जेवढे प्रखर होते तेवढेच ते कवी, अभंगकार म्हणूनही सुप्रसिद्ध होते. ग्वाल्हेर येथील धृपद घराणे आणि खयाल गायकी घराण्याची कितीतरी गीते त्यांनी लिहिलेली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमात पराक्रमी महादजी शिंदे यांचा इतिहास असावा यासाठी प्रयत्न करणार", असे आश्वासन त्यांनी यावेळी मंचावरून दिले. 'महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार' हा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना, भाऊंना आणि महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करीत असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आपण आतापर्यंत काम करीत आहोत. आज मिळालेला हा पुरस्कार कामाची पोचपावती असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले.
शरद पवार यांनी यावेळी दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमुळे दिल्लीतील मराठी लोकांना मानसिक समाधान मिळत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. तसेच हे संमेलन यशस्वी करण्यासाठी दिल्लीतील प्रत्येक मराठी माणूस आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. साहित्य संमेलनानिमित्त मराठी माणसाला एक पर्वणीच लाभलेली असल्याचे पवार यावेळी म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी महादजी शिंदे यांच्या इतिहासातल्या नोंदी उलगडल्या. दिल्लीत वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या कर्तृत्ववान मराठी व्यक्तींचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी केले. सूत्रसंचालन निवेदिता वैशंपायन यांनी तर आभार प्रदर्शन सहसंयोजक लेशपाल जवळगे यांनी केले. शमिमा अख्तर यांच्या अभंग गायनाचा तसेच मराठी गीत गायनाचा कार्यक्रम यावेळी झाला.