नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या (आप) पंजाबमधील पक्षसंघटनेमध्ये असलेल्या असंतोषाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आपप्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील कपूरथला हाऊस येथे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, मंत्री आणि आमदारांची बैठक घेतली.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, दिल्ली निवडणुकीत आमदारांनी केलेल्या कामाबद्दल अरविंद केजरीवाल यांनी त्यांचे आभार मानले. पंजाब सरकार लोकांच्या कल्याणासाठी काम करत आहे. आजही दिल्लीतील लोक म्हणतात की गेल्या ७५ वर्षात त्यांनी असे काम पाहिले नाही जे 'आप'ने गेल्या १० वर्षात केले आहे. आम्ही पंजाबमध्ये दिल्लीचा अनुभव वापरू. येत्या दोन वर्षांत आपण पंजाबला एक असे मॉडेल बनवू जे संपूर्ण देशासाठी आदर्श बनेल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री मान यांनी सांगितले.
पंजाबमध्ये आपचे आमदार बंड करतील, या विरोधी पक्षनेते प्रतापसिंग बाजवा यांचा दावाही मुख्यमंत्री मान यांनी फेटाळून लावला. ते पुढे म्हणाले, बाजवा गेल्या जवळजवळ साडेतीन वर्षांपासून हेच सांगत आहेत. मात्र, त्यांनी आमचे आमदार मोजण्याऐवजी दिल्लीतील आपल्या पक्षाच्या कामगिरीकडे लक्ष द्यावे. यापूर्वीदेखील त्यांनी ४० आमदार पक्ष सोडत असल्याचा दावा केला होता. मात्र, त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे मुख्यमंत्री मान यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे पंजाबमध्ये नेतृत्वबदलाविषयीदेखील कोणत्याही प्रकारची चर्चा बैठकीत झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.