घराघरात लक्ष्मीची पावलं उमटणार! केंद्रीय अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

    01-Feb-2025
Total Views |
 
Shinde
 
मुंबई : देशाच्या अर्थसंकल्पात १२ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती मिळाल्याने आता घराघरात लक्ष्मीची पावलं उमटल्याशिवाय राहणार नाहीत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवार, १ फेब्रुवारी रोजी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला.
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "देशाचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताचे पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात येणार, याची खात्री देणारा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सामान्य नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळालाय, त्याचे वर्णन अभूतपूर्व असेच करावे लागेल. १२ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती मिळाल्याने आता घराघरात लक्ष्मीची पावलं उमटल्याशिवाय राहणार नाहीत. एक सर्वांगसुंदर, आत्मनिर्भर भारताला सबळ करणारा हा अर्थसंकल्प आहे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  नवीन कॉटन मिशनचा महाराष्ट्राला सर्वाधिक फायदा होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
ते पुढे म्हणाले की, "शिक्षण, आरोग्य आणि कृषी या तिन्ही महत्त्वाच्या क्षेत्रांना अर्थसंकल्पातील कल्पक तरतुदींचा लाभ होणार असल्याने देशाच्या प्रगतीचा आलेख अधिकाधिक उंचावत जाणार यात शंकाच नाही. हा सशक्त भारताचा रोडमॅप आहे. दुरावस्था संपवून पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्त्वात आपला भारत देश सुबत्तेच्या दिशेने वाटचाल करु लागल्याची ही शुभचिन्हे आहेत," असेही ते म्हणाले.