मुंबई : ( Nitesh Rane ) "पर्यावरणप्रेमाच्या आडून कुंभमेळा आणि हिंदू उत्सवांना बदनाम करण्याचा डाव आहे, अशी टीका मत्स्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी केला. तपोवनमधील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत. तेव्हा गप्प का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मंत्रालयात माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, ”हिंदू समाजासाठी कुंभमेळा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधूंना राहण्यासाठी ती जागा उपलब्ध होणार आहे, असे मी ऐकतो आहे; पण हे सगळे पर्यावरणप्रेमी आणि प्राणीप्रेमी अन्य धर्मांच्या उत्सवांवर कधीही असे प्रश्न उपस्थित करत नाहीत. आपल्या देशात खरोखरच सर्वधर्मसमभाव असेल, तर केवळ हिंदूंच्याच सण-उत्सवांवर प्रश्न किंवा हरकती का घेतल्या जातात? ईदच्या वेळी मोठ्याप्रमाणात बकर्यांची कत्तल होते, रक्ताचे पाणी रस्त्यांवर वाहते, तेव्हा हे पर्यावरणप्रेमी कधीच आवाज उचलताना दिसत नाहीत. ‘व्हर्च्युअल बकरी ईद’ साजरी करा, असे कोणी म्हणत नाही. मग, एका धर्माला एक न्याय आणि दुसर्या धर्माला दुसरा न्याय कशाला?” असा सवाल त्यांनी केला.
हिंदू धर्माला टार्गेट करण्याचा प्रयत्न
झाडे जगली पाहिजेत, यात दुमत नाही; पण ज्याप्रमाणे झाडाला मिठी मारतात, त्याचप्रमाणे बकरीला मिठी मारून तिची कत्तल थांबवत नाहीत. काही लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आरोप केले जात असून, त्यावर मी प्रश्न विचारतो आहे. कुंभमेळ्याला बदनाम करण्याचा हा कार्यक्रम आहे. हा भाजप किंवा राष्ट्रवादी हा विषय नाही. मी हिंदू म्हणून प्रश्न विचारतो आहे, असेही ते म्हणाले.