ॐ आदिगुरू दत्तात्रेय : आत्मज्ञानाचा महामेरू

04 Dec 2025 10:57:55
 
Datta Jayanti 
 
या देशाला गुरुपरंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. मात्र, जेव्हा गुरु हा विषय येतो, त्यामध्ये भगवान दत्तात्रेयांचे नाव आद्यक्रमाने येते. म्हणूनच त्यांना ‘आदिगुरु’ देखील म्हटले जाते. गुरु दत्तात्रेयांच्या अनेक लीला भक्तांना ज्ञात असतील. आज गुरु दत्तात्रेयांच्या, त्यांच्या अवतारांच्या लीलांची पारायणेदेखील असंख्य ठिकाणी होतात. मानवाला अध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक असलेले अत्मज्ञान मिळावे, म्हणून भगवान दत्तात्रेय यांनी सांगितलेले ‘त्रिपुरारहस्या’चा श्री दत्त जयंतीनिमित्ताने घेतलेला आढावा...
 
दत्त जयंतीनिमित्ताने भगवान दत्तात्रेय यांच्या अपरिचित पैलूंवर प्रकाश टाकण्याचा, हा एक सश्रद्ध प्रयास आहे. भगवान दत्तात्रेय म्हणजे भारतीय अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाचा एक जिवंत, चालता-बोलता ग्रंथ आहे. त्यांना त्रिमूर्तींचे (ब्रह्मा, विष्णू, महेश) एकत्रित स्वरूप समजले जाते. त्यांचा उल्लेख ‘आदिगुरू’ असा केला जातो. दत्तात्रेयांच्या जन्माची कथा अत्यंत विलक्षण आहे आणि त्यांच्यामुळेच, सामान्य जनांना ‘त्रिपुरारहस्य’ हे श्रीविद्येतील परमज्ञान प्राप्त झाले आहे.
 
दत्तजन्म हे महर्षी अत्री आणि त्यांची धर्मपत्नी माता अनसूया यांच्या, एकांतवासातील तपस्येचे फळ आहे. अत्री ऋषी ज्ञानाचे भंडार होते आणि अनसूया आपल्या पतिव्रता धर्मासाठी आणि मातृत्वाच्या शुद्ध ऊर्जेसाठी, त्रिखंडात प्रसिद्ध होत्या. त्यांच्या अंतःकरणात परमेश्वराच्या तेजाने युक्त अशा पुत्राची उत्कट इच्छा होती. त्यांनी केवळ पुत्रप्राप्तीसाठी नव्हे तर त्रिलोकातील सर्वोत्तम तेज आपल्या पोटी अवतरावे, यासाठी कठोर तपश्चर्या सुरू केली. अनसूयांचे पावित्र्य हे नुसते व्रत नव्हते, तर ते परमेश्वरावरील निस्सीम प्रेम आणि निरपेक्ष भक्तीचे ते मूर्त स्वरूपच होते. या शुद्ध प्रेमाच्या यज्ञातूनच, दत्तात्रेयांच्या अवताराची पार्श्वभूमी तयार झाली.
अनसूयेच्या या अलौकिक पावित्र्याचे वर्णन जेव्हा नारद मुनींनी स्वर्गलोकी केले, तेव्हा त्रिमूर्तींच्या पत्नींच्या सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांच्या मनात क्षणभर मानवी अहंकार डोकावला. त्यांच्या मनात ईर्षा निर्माण झाली की, ‘ज्यांचे पावित्र्य आपल्या पतींच्या शक्तीपेक्षा श्रेष्ठ मानले जाते, त्या अनसूयेची परीक्षा घ्यावी.’ पतीच्या महानतेवर त्यांचा पूर्ण विश्वास होता, पण अनसूयेच्या पातिव्रत्यासमोर त्यांच्या तेजाची कसोटी लागल्याचे पाहून त्यांना चिंता वाटू लागली. म्हणून, त्यांनी आपल्या पतींना, त्रिमूर्तींना, साधूंचे वेश धारण करून अनसूयाच्या आश्रमात पाठवले.
 
आश्रमात केवळ अनसूया असताना, वृद्ध साधूंच्या रूपात आलेल्या देवतांनी अत्यंत विचित्र मागणी केली. त्यांनी सांगितले की, त्यांना अनसूयेने दिगंबर अवस्थेत भिक्षा द्यावी. ही मागणी म्हणजे, अनसूयेच्या धर्मावर आलेले मोठे संकट होते. अतिथीचा अपमान करणे हे पाप आणि पतिव्रता धर्म मोडणे म्हणजे आत्म्याचा नाश. या कठीण प्रसंगातही अनसूयेने क्षणभरही डगमगून न जाता, आपल्या पतीचे आणि पातिव्रत्याचे स्मरण केले. ‘जर माझे मन कधीही परपुरुषाबद्दल विचलित झाले नसेल, तर हे वृद्ध साधू माझे बालक व्हावेत,’ असे म्हणून तिने, आपल्या कमंडलूतील पाणी त्यांच्यावर शिंपडले. तिच्या मातृत्वाच्या आणि शुद्धतेच्या सामर्थ्याने त्याच क्षणी ते त्रिमूर्ती, सहा महिन्यांच्या निष्पाप बालकात रूपांतरित झाले.
 
बालक झालेल्या त्रिमूर्तींना अनसूयेने मातृभावाने स्वीकारले. तिने त्यांना दिगंबर अवस्थेत दूध पाजले, त्यांना मधुर गीत गात पाळण्यात झोपवले. साक्षात विश्वाचे नियंत्रण करणारे देव, एका सामान्य मातेच्या पदरात खेळू लागले. हा क्षण म्हणजे मातृशक्तीचा आणि निरपेक्ष प्रेमाचा सर्वांत मोठा विजय होता. यातून हे सिद्ध झाले की, जगातील सर्व शक्ती आणि ज्ञान शुद्ध आणि निरपेक्ष वात्सल्यासमोर लीन होते. इकडे, देवींना जेव्हा आपल्या पतींचे बाळरूप कळाले, तेव्हा त्यांना आपली चूक उमगली. त्यांनी अनसूयेजवळ येऊन विनम्रपणे क्षमा मागितली आणि आपल्या पतींना मूळ रूपात परत आणण्याची विनंती केली. अनसूयेने बालकांना त्यांच्या मूळ स्वरूपात आणले.
 
यानंतर, कृतज्ञ झालेल्या त्रिमूर्तींनी अनसूयेला वरदान दिले, "हे माते, तुझ्या शुद्ध प्रेमाने आम्ही बांधले गेलो आहोत. आम्ही तिघेही एकाच अंशात तुझ्या पोटी पुत्र म्हणून जन्म घेऊ.” या आशीर्वादातूनच, मार्गशीर्ष पौर्णिमेला, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे तेज एकत्र येऊन श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला. अशा प्रकारे, दत्त जयंती हा केवळ जन्मदिवस नसून, पातिव्रत्य, मातृशक्ती आणि त्रिमूर्तींचे ऐय यांचा सोहळा आहे.
 
दत्तात्रेयांचे जीवन केवळ जन्माच्या चमत्कारावर थांबत नाही, तर ते ज्ञानाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेले ईश्वरी स्वरूप होते. ते ‘गुरू तत्त्व’ म्हणून ओळखले जातात; कारण त्यांनी संपूर्ण सृष्टीलाच आपले गुरू मानले. त्यांनी २४ गुरूंकडून ज्ञान प्राप्त केले. पृथ्वीकडून सहनशीलता, वायूकडून अलिप्तता, माशाकडून लोभाचे दुष्परिणाम आणि कबुतराकडून आसक्तीचा त्याग अशा प्रकारे त्यांनी, निसर्गाच्या प्रत्येक घटकात परमेश्वराचा संदेश पाहिला. यातून त्यांनी मनुष्याला शिकवले की, ज्ञानाचा शोध केवळ ग्रंथांमध्ये किंवा आश्रमांमध्ये नाही, तर आपल्या भोवतालच्या प्रत्येक क्षणात आहे. साधकाने सदैव शिष्य वृत्ती ठेवून प्रत्येक परिस्थितीतून ज्ञानग्रहण करावे.
 
आपल्या गुरुतत्त्वाला मूर्त रूप देण्यासाठी भगवान दत्तात्रेयांनी, आपल्या शिष्य परशुरामांना ‘त्रिपुरारहस्य’ हे अलौकिक ज्ञान प्रदान केले. हा ग्रंथ म्हणजेच अद्वैत वेदान्त आणि शक्ती उपासनेचे अंतिम सार आहे. परशुराम, युद्धात सर्वस्व गमावल्यामुळे अत्यंत दुःखी आणि मोक्षाच्या शोधात होते. गुरू दत्तात्रेयांनी त्यांना शांतपणे समजावले की, या संसारातील दुःख आणि बंधनाचे कारण बाह्य जग नसून, आपल्या अज्ञानात आहे.
 
दत्तात्रेयांनी ‘त्रिपुरा’ अर्थात श्री ललिता त्रिपुरसुंदरी देवीला शुद्ध चेतना ( Pure Consciousness ) म्हणून परिभाषित केले. ‘त्रिपुरा’ म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थांच्या पलीकडील परम सत्य. ते परशुरामांना सांगतात की, हे जग आणि हे शरीर केवळ मायेचा खेळ आहे; सत्य केवळ एकच आहे, ते म्हणजे तुमचे आत्मस्वरूप, म्हणजेच ती शुद्ध चेतना. तुम्ही शरीर नाही, तुम्ही कर्ता नाही, तुम्ही केवळ जाणणारे आहात, हेच या ग्रंथाचे सार आहे.
 
‘त्रिपुरारहस्य’ ग्रंथाच्या निर्मितीची पद्धत, याला अधिक अभ्यासपूर्ण आणि रहस्यमय बनवते. हरितायन ऋषींनी हा संवाद प्रत्यक्ष तिथे उपस्थित राहून ऐकला नाही, तर त्यांनी एकांतस्थळी गहन ध्यानमग्न अवस्थेत असताना, तो अलौकिक श्रवणाने (दिव्य दृष्टी आणि श्रवणशक्तीने) ग्रहण केला.
 
हरितायन ऋषींचे चित्त इतके शुद्ध आणि एकाग्र होते की, ते भौतिक सीमांच्या पलीकडील ज्ञान ग्रहण करू शकले. ध्यान पूर्ण झाल्यावर, त्यांनी हे अलौकिक ज्ञान मानवांच्या कल्याणासाठी श्लोकांच्या रूपात शब्दबद्ध केले. या घटनेतून हे सिद्ध होते की, उच्च आध्यात्मिक ज्ञान हे केवळ बुद्धीने समजत नाही, तर ते शुद्ध चेतनेच्या स्तरावर उतरते. ज्याचे मन शांत, एकाग्र आणि वासनामुक्त आहे तोच या परम रहस्याचे श्रवण आणि आकलन करू शकतो. हा ग्रंथ म्हणजे हरितायनांच्या तपश्चर्येचे फलित आणि गुरू-शिष्य परंपरेच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे.
 
भगवान दत्तात्रेयांच्या जन्माची कथा आपल्याला शिकवते की, मातृत्वाचा आणि भक्तीचा शुद्ध भाव सर्वशक्तिमान देवांनाही आपल्या अधीन करू शकतो; तर ‘त्रिपुरारहस्य’चा उपदेश आपल्याला आत्मबोध आणि मोक्षाचा अचूक मार्ग दाखवतो. दत्त जयंती आणि ‘त्रिपुरारहस्य’चा हा अभ्यास, ज्ञानाची आणि भक्तीची सांगड घालतो. जीवनातील अंतिम सत्य हे कोणत्याही बाह्य रूपात नसून, आपल्या अंतर्मनातील शुद्ध चेतनेत आहे. आदिगुरू दत्तात्रेयांनी दाखवलेला हा समन्वयाचा मार्ग, आजही प्रत्येक साधकासाठी शाश्वत आणि प्रेरणादायक आहे.
 
- ब्रह्मचैतन्य उदयनाथ महाराज
(लेखक अध्यात्मिक साधक असून, त्यांनी आध्यात्मिक प्रवचन, ध्यान शिबीर, साधना सप्ताह इत्यादींचे आयोजन वेळोवेळी केले आहे. प्रत्येक मानवाच्या अंतर्गत दडलेल्या चैतन्याला प्रकट करण्यासाठी मार्गदर्शन करणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे.)
 
 
Powered By Sangraha 9.0