मुंबई : (Rajnath Singh slams Congress MP Rahul Gandhi) देशाच्या लष्करावर केवळ १० टक्के लोकांचे नियंत्रण असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बिहारच्या प्रचारसभेत केले होते. यावरून देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी त्यांच्यावर टीका करत सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. संरक्षण मंत्र्यांनी राहुल गांधी यांच्यावर भारतीय लष्कराला विभागण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी, "सैन्याला कोणताही धर्म किंवा जात नसते," असे स्पष्ट केले आहे. तसेच "सैन्याला राजकारणात ओढू नका" असा इशाराही दिला.
सैन्याला राजकारणात ओढू नका
बिहारमधील बांका येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, "राहुल गांधी हे संरक्षण दलांमध्ये आरक्षणाची मागणी करून देशात अराजकता (Anarchy) निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आरक्षण असले पाहिजे. आरक्षणाच्या बाजूने आम्ही देखील आहोत आणि आमचा पक्ष देखील आहे. जेवढे गरीब आहेत त्या सर्वांना आरक्षण दिले. पण लष्करात जातीपातीच्या आधारावर? मला वाटतं की याची चर्चा देखील झाली नाही पाहिजे. आपल्या सैनिकांचा एकच धर्म असतो तो म्हणजे सैन्य धर्म, त्याव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म नसतो. त्यामुळे सैन्याला राजकारणात ओढू नका. जेव्हा जेव्हा या देशावर संकट आले आहे तेव्हा आमच्या सैनिकांनी त्यांच्या शौर्य आणि शौर्याचे प्रदर्शन करून भारताचे डोके उंचावले आहे."
राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींवर जाती, पंथ किंवा धर्माच्या आधारावर भेदभाव केल्याबद्दल टीका केली आणि म्हणाले, "जाती, पंथ आणि धर्माच्या या राजकारणामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे आणि आमचा विचार असा आहे की समाजातील सर्व घटकांचे उत्थान झाले पाहिजे. आमचे ध्येय समाजातील सर्व घटकांना समाविष्ट करणे आहे. आम्हाला जात, पंथ किंवा धर्माच्या आधारावर भेदभाव करायचा नाही. आपल्या देशातील साधू-मुनींनी आणि लोकांनी याबद्दल कधीही विचारही केला नाही," असे संरक्षणमंत्र्यांनी पुढे सांगितले.