महाभारतामध्ये कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णांनी अर्जूनाला सांगितलेली गीता म्हणजे भारतीय ज्ञानपरंपरेतील सुवर्णपान. काळाच्या ओघामध्ये अनेक ज्ञानवंतांनी भगवद गीतेवर महत्वपूर्ण भाष्य केले. लोकमान्य टिळकांनी गीतारहस्याच्या माध्यमातून गीतेतील कर्मयोग भारतीयांना उलगडून सांगितला.आजच्या युगामध्ये भगवद गीता व्यक्तीच्या उत्कर्षासाठी कशा प्रकारे मदत करु शकते? भगवद गीतेच्या विचारवैभवाचे आजच्या काळातील आकलन कसे असायाला हवे या विषयी आपल्याला माहिती सांगत आहेत प्रख्यात शिक्षणतज्ञ, नेतृत्व तसेच व्यवस्थापन कौशल्यावर भारतामध्ये तसेच भारताबाहेर लोकांना मार्गदर्शन करणारे धनंजय गोखले.
१. भगवद गीता ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली मौलिक देणगी आहे, एक शिक्षणतज्ञ म्हणून तुम्ही गीतेकडे कसं बघता?
मला असं वाटतं की भगवद्गीता ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली केवळ मौलिक देणगी नाही, तर ती मानवी जीवनातील फ्रस्ट्रेशन आणि गोंधळ यावर मात करण्यासाठी आवश्यक असणारे एक माहितीपत्रक (Manual) आहे.शिक्षणतज्ञ म्हणून मी गीतेकडे केवळ तत्त्वज्ञान म्हणून पाहत नाही, तर ती एक ‘आनंददायी नाट्यकृती’ आहे, जी लोकांना ‘जगण्याचं कौशल्य’ शिकवते. माझ्या मते, गीता आपल्याला आत शांतता आणि बाहेर उत्कृष्टता यांचा बॅलन्स शिकवते.
२. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगामध्ये भगवद गीता आपल्या लोकांना कशा प्रकारे दिशा देऊ शकेल?
कृत्रिम बुद्धिमत्तेचे (AI) युग हे माहिती आणि डेटाचे युग आहे. AI आपली कार्यक्षमता (Efficiency) वाढवेल, पण मानसिक अस्थिरता आणि मोह निर्माण करेल, आपले आपल्यालाच दूर करायचे आहेत.. अशा वेळी भगवद्गीता योग्य दिशा देऊ शकेल:AI मुळे माणसाला माहितीचा आणि पर्यायांचा प्रचंड भडिमार होतो, ज्यामुळे मानसिक गोंधळ वाढतो. गीतेतील ‘बुद्धीत समत्व’ किंवा ‘स्थितप्रज्ञता’ ही संकल्पना आजच्या युगातील लोकांना त्यांच्या बुद्धीला स्थिर ठेवण्यास मदत करेल. स्थितप्रज्ञ हेच खरे ‘सायबर प्रज्ञ’ आहेत, जे माहितीच्या महापुरातही योग्य निर्णय घेऊ शकतात.डेटाच्या ओझ्यामुळे निर्माण होणारे भ्रम आणि संशय दूर करण्यासाठी, गीतेतील अंतिम अवस्था गाठणे अत्यावश्यक आहे: ‘नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा स्थितोऽस्मि गतसन्देहः’ (मोह नष्ट झाला, स्मृती प्राप्त झाली आणि मी स्थिर झालो, सर्व संशय दूर झाले). गीतेतील हा प्रवास माणसाला खरी शांतता देतो.AI आपल्याला हवी असलेली उत्तरे देईल, पण कोणते प्रश्न विचारायचे आणि स्वतःच्या जडणघडणीसाठी AI ला प्रश्न विचारायला लावणे हे माणसालाच ठरवावे लागेल. गीतेतील मूलभूत प्रश्न विचारण्याची मांडणी दिशा देईल, ज्यामुळे AI चा वापर अधिक परिणामकारक होईल.
३. आपण मध्यंतरी "अथर्वशीर्ष ते भगवद्गीता" असा एक उपक्रम राबवला होता, त्या विषयी सांगा.
'अथर्वशीर्ष ते फलश्रुती via भगवद्गीता' हे या उपक्रमाचे सूत्र आहे. हा उपक्रम म्हणजे क्षमता आणि कृती यांचा समन्वय साधणारे एक तंत्र आहे, जे मी गेली काही वर्ष राबवत आहे. मी अथर्वशीर्षाकडे क्षमतांची (Competencies) यादी म्हणून पाहतो. अथर्वशीर्षात सांगितलेल्या 52 क्षमतांचा उपयोग जीवनात कसा करायचा, त्याची कृतीची पद्धत (Recipe or Technique) भगवद्गीता शिकवते. या उपक्रमात मी गीतेच्या सुरुवातीला अर्जुनाची जी स्थिती आहे, तिचा थेट संबंध क्षीण झालेल्या मूलाधार चक्राशी जोडतो. गीतेमधील संवादामध्ये कृष्ण ते मूलाधार चक्र स्थिर करतो. गीतेतील हा प्रवास म्हणजे अस्थिरतेकडून स्थिरतेकडे केलेला प्रवास आहे. अथर्व या शब्दाचा अर्थ सुद्धा "स्थिरता" असाच आहे. भ्रमतीव मे मन: - "माझं मन पुरतं गोंधळून गेलं आहे, बुद्धी सुद्धा काम करत नाहीये आणि शरीर तर संपूर्ण हतबल झालं आहे" अशा अवस्थेतून ‘नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा स्थितोऽस्मि गतसन्देहः’ - कृष्णा, आठवलं रे आला सगळं! आता गोंधळ नाही, संशय नाही! एकदम फिट आहे मी. पक्का स्थिर आहे. आता तू सांगशील ते मी करेन - या अवस्थेपर्यंतचा प्रवास आहे.
४. भगवद्गीतेचा विचार भारतीय जनमानसामध्ये कायमच होत असतो, मात्र तुम्ही ज्या वेळेला परदेशात हा विचार मांडतात, तेव्हा त्यांचा प्रतिसाद काय असतो?
गीतेचा विचार मांडताना, मी नेहमीच एक युनिव्हर्सल मॅनेजमेंट टूल म्हणून सादर करतो, ज्यामुळे त्याला जागतिक स्तरावर उत्तम प्रतिसाद मिळतो. परदेशात मी गीतेचा वापर व्यवस्थापन आणि नेतृत्व संकल्पना समजावून देण्यासाठी करतो.अगदी सौदी अरेबिया, कतार, दुबई इत्यादी आखाती देशांमध्ये सुद्धा Project Management मधील स्टेकहोल्डर मॅनेजमेंट स्पष्ट करताना, मी श्लोक 6.9 चा वापर करतो: “सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु। साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते।।6.9।।” (well wishers, मित्र, शत्रू, , मध्यस्थ, द्वेष करणारे, संबंध नसणारे, सर्वांचं कायम वाईटच करणारे, सर्वांचं कायम चांगलंच करणारे आणि नातेवाईक अशा नऊ प्रकारच्या मानसिकतांना तोंड द्यावे लागते). या नऊ प्रकारच्या स्टेकहोल्डर्सकडे ‘समबुद्धीने’ (Equanimity) कसे पाहायचे, म्हणजे यांच्यात अडकण्या पेक्षा काम (project) प्रामाणिकपणे करणे आणि कामाबरोबर प्रामाणिक राहणे हे या श्लोकात सांगितले आहे. भारतीय असो वा परदेशी, अर्जुनाचे प्रश्न आपलेच आहेत हे सत्य आहे. परदेशी लोक गीतेला केवळ अभिमान म्हणून नव्हे, तर एक वापरण्यायोग्य लाइफ स्किल म्हणून स्वीकारतात, ज्यामुळे त्याचा खरा उपयोग होतो.
५. आजच्या जगामध्ये व्यवस्थापन कौशल्य याला अनन्यसाधारण महत्व आले आहे, त्या अनुषंगाने भगवद गीता आपल्याला काय सांगते?
- भगवद्गीता हे आजच्या व्यवस्थापन कौशल्याचे संपूर्ण मार्गदर्शन आहे. गीतेत व्यवस्थापनाचे केवळ उद्दिष्टच नव्हे, तर ते साध्य करण्याची पद्धत (Process) आणि त्यासाठी लागणारी मानसिकता (Mindset) दोन्ही स्पष्ट केले आहेत. कितीतरी उदाहरणं देता येतील
प्रोसेसचे महत्त्व: काम करताना शास्त्राचे (नियम, प्रोसेस) पालन करणे किती महत्त्वाचे आहे, हे गीता सांगते: "तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ। ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि।।16.24।।" (काय करावे आणि काय करू नये, हे ठरवण्यासाठी शास्त्र म्हणजेच नियम, process हेच तुझे प्रमाण असू द्यावेत.)
⦁ जर प्रोसेस पाळली नाही, तर: काय परिणाम होतो हे स्पष्ट सांगितले आहे: "यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः। न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम्।।16.23।।" (जो process सोडून मनमानी पद्धतीने काम करतो, त्याला यश, सुख किंवा पुढच्या संधीसुद्धा मिळत नाही.)
⦁ यशावर परिणाम करणारे घटक: एखादे कार्य यशस्वी होण्यासाठी केवळ 'कर्ता' (Doer) महत्त्वाचा नसतो. यशावर परिणाम करणाऱ्या पाच गोष्टी गीता सांगते: "अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्। विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्।।18.14।।" (vision-mission, कर्ता, विविध साधने (इन्स्ट्रुमेंट्स), वेगवेगळ्या क्रिया आणि पाचवे म्हणजे दैव - मागे करून ठेवलेल्या कामांचे परिणाम).
⦁ चिकाटीचे महत्त्व: मोठे यश मिळवण्यासाठी सातत्य आणि चिकाटी आवश्यक आहे: "शनैः शनैरुपरमेद् बुद्ध्या धृतिगृहीतया । आत्मसंस्थं मनः कृत्वा न किञ्चिदपि चिन्तयेत्।।6.25।।" (धैर्य आणि स्थिर बुद्धीच्या मदतीने हळू हळू होतो घेतलेले काम पूर्ण करणे.)
६. भगवद्गीता वाचणे हा एक भाग झाला, परंतु त्याचे आकलन कसे होते? गीता समजून कशी घ्यावी?
गीतेचे आकलन केवळ पाठांतराने होत नाही, तर ते संवेदनशील स्व-संवादातून आणि वापरातून होते.
⦁ भगवद्गीता हे आयुष्यातील विविध प्रसंगांना तोंड देण्यासाठी तयार केलेले एक रेसिपीबुक आहे. रेसिपीबुक कुणी कधी पाठ करत नाही. त्यात सांगितलेल्या कृती, युक्त्या वापरून त्यांची प्रॅक्टिस करावी लागते. रेसिपीबुक पाठांतराच्या स्पर्धा घेणे हास्यास्पद आहे. गीता तर जगण्याचे तंत्र सांगते, मग ती पाठ करायची की वापरायची, याचा साकल्याने विचार व्हायला हवा.
⦁ जेव्हा आपण 'मला सगळ्या अध्यायांची नावे पाठ झाली, श्लोक पाठ झाले, पण गीतेमधली गम्मत काही कळली नाही' या अवस्थेतून बाहेर पडून ‘कॉफीशॉपमध्ये चाललेल्या दोन मित्रांच्या हृद्य गप्पांसारखा हा संवाद’ अनुभवतो, तेव्हाच त्याचे आकलन होते. जेव्हा मी स्वतःमधील हरवलेल्या अर्जुनाला संवेदनशीलतेने पाहतो आकलन तेव्हाच सुरू होते,. प्रश्न पडायला हवेत आणि उत्तरं सापडण्याची आस लागायला हवी. फ्रस्ट्रेशन आणि गोंधळाची स्थिती मान्य करणे, ती समग्रतेने पाहणे हेच आकलनाचे प्रवेशद्वार आहे.
७. भगवद्गीता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले गेले पाहिजे?
भगवद्गीता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी सिस्टिमॅटिक नेटवर्क आणि आधुनिक स्वरूपाचा अवलंब करत आहे.
⦁ केवळ माझ्या व्यक्तिगत प्रयत्नांनी नव्हे, तर Fa. Fe. Fra. Fu. (Family, Fellow, Franchise, Furtive) या सिस्टिमॅटिक नेटवर्कच्या माध्यमातून, Associates आणि Ambassadors च्या मदतीने गेली काही वर्ष शाळा, महाविद्यालये, कॉर्पोरेट्स आणि सेवाभावी संस्थांपर्यंत मी पुस्तके, प्रयोगशाळा आणि कोर्सेस पोहोचवत आहे.
⦁ मी गीतेला आजच्या पिढीला आवडेल अशा स्वरूपात सादर करत आहे. ही शिकवण मी वयाच्या विसाव्या वर्षीच सुरू व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहे. ही प्रवचनं नाहीत, तर प्रयोगशाळा आहेत.
⦁ गीता ही जीवन कौशल्य (Life Skills) म्हणून आणि मुलांच्या दैनंदिन समस्यांशी जोडून (उदा. गणिताची आवड-नावड), मार्कांसाठी नव्हे तर वापरण्यासाठी शिकवावी लागेल.
⦁ अप्लाइड अथर्वशीर्ष तसेच गोष्ट भागवद्गीतेची या कोर्सेसच्या आत्ता पर्यंत ३४ आणि २२ बॅचेस झाल्या आहेत, आणि अनेक ठिकाणी सलग काही दिवसांचे कार्यक्रम, नाट्यवाचन, प्रयोगशाळा झाल्या आहेत. DGTal Audio-Video Books आणि व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून; ‘कॉफीशॉप भगवद्गीता’ या नाटकाच्या रूपात देखील हा संवाद मी लोकांपर्यंत पोहोचवला आहे.