Devendra Fadnavis : बीडीडी चाळ ‘अत्यावश्यक प्रकल्प’ म्हणून घोषित करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Total Views |
Devendra Fadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) राज्यातील सुरू असलेले विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावे. हे प्रकल्प सुरू असताना येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करण्यात याव्यात तसेच नवीन प्रकल्प दोन ते अडीच वर्षात पूर्ण झाले पाहिजे. बीडीडी चाळ हा अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करण्याची सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे सोमवार, दि.3 रोजी मुंबई उपनगर, ठाणे व पुणे येथे सुरू असलेल्या पायाभूत विकास प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित प्रकल्पाचे कंत्राटदार उपस्थित होते.
 
मुंबई मेट्रो लाईन - 2 -बी 'डी.एन.नगर ते डायमंड गार्डन-मंडाले' हा मेट्रो प्रकल्प 31 मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्वामी समर्थनगर ते विक्रोळी ही मेट्रो लाईन 31 डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यात यावी. याकरिता नगरविकास विभागाने श्याम नगर स्टेशन येथील जमिनीसंदर्भातील अडचणी 15 दिवसात सोडवाव्यात. शिवडी ते वरळी हा जोडमार्ग प्रकल्प दिवसरात्र कामे करून पूर्ण करण्यात यावा. जे प्रकल्प मागे पडले ते वेळेत कसे पूर्ण होतील, यासाठी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराने लक्ष देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले.
 
 
नायगाव येथील बीडीडी चाळ प्रकल्प जून 2029 पर्यंत पूर्ण तर वरळी येथील प्रकल्प मे 2029 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. मुंबईतील एन.एम.जोशी बीडीडी चाळ प्रकल्प हा जून 2031 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘बीडीडी चाळ’ प्रकल्पास अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करण्याची सूचना केली.
 
ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प, उत्तन विरार सी लिंक प्रकल्प, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्प योग्य नियोजन करून वेळेत पूर्ण होईल, असे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले. ते म्हणाले की, ऐरोली-कटई नाका फ्रीवे प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ 20 मिनिटावर येणार आहे. यासाठी जमीन अधिग्रहणासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तात्काळ रक्कम द्यावी.
 
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणामार्फत वडपे-ठाणे हा 23.8 कि.मी. रस्ता बांधकाम सुरू असून यातील 19 किमीचा रस्ता तयार झाला असून संपूर्ण रस्ता मार्च 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. हा रस्ता समृद्धी महामार्गासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
 
त्याचबरोबर मुंबई पुणे मिसिंग लिंकचे काम लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. वांद्रे -वर्सोवा सी लिंक प्रकल्पाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेळेत कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले.
 
 
मुंबई महानगरपालिकेमार्फत मागाठाणे-गोरेगाव डी.पी.रोडचे सुरू असून यासाठी जमीन अधिग्रहणाबरोबरच प्रकल्पग्रस्तांसाठी बांधण्यात येणारे निवासस्थानाचे काम गतीने पूर्ण करण्यात यावे. प्रकल्पाग्रस्तांकरिता बांधण्यात येणाऱ्या घरांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात यावा. ज्या ठिकाणी आवश्यकता असेल तेथे जुनी प्रकल्पबाधितांची घरे नवीन तंत्रज्ञानाने तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. फिल्म सिटी गोरेगाव ते खिंडीपाडा मुलुंड येथे दुहेरी बोगद्यांचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी कंत्राटदारांनी जास्त मनुष्यबळ नियुक्त करावे. या प्रकल्पामुळे पश्चिम उपनगरातील नागरिक नवी मुंबई विमानतळाकडे सहज पोहचू शकणार आहेत. वर्सोवा ते दहिसर ते भाईंदर या मुंबई कोस्टल रोड प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून खार जमिनीची परवानगी मिळाली असून हा प्रकल्प 30 डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण होण्यासाठी वेगवेगळे टप्पे करण्याचे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
 
मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यासोबतच महावितरण,जलसंपदा आणि सिडको यांच्यामार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला.
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.