मुंबई : ( Grand flag hoisting ceremony in Ayodhya ) राममंदिरावरील धर्मध्वज फक्त एक ध्वज नसून भारतीय सभ्यतेच्या पुनर्जागरणाचा ध्वज आहे. धर्मध्वजाचा भगवा रंग त्यावर अंकित सूर्यवंशाची कीर्ती, वर्णिलेले ‘ॐ’ आणि कोविदार वृक्ष यांची छटा; हे सर्व रामराज्याच्या गौरवाचे प्रतीक आहेत. हा ध्वज संघर्षातून सृजनाची गाथा आहे, हा ध्वज शतकानुशतकांपासून चालत आलेल्या स्वप्नांचे साकार रूप आहे. असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी विवाह पंचमीचे औचित्य साधून अयोध्येत श्रीराम जन्मभूमी परिसरात राममंदिरावरील भव्य ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपिठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास महाराज, कोषाध्यक्ष महंत गोविंददेव गिरिजी महाराज, महामंत्री चंपत राय आदि मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधत नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, भव्य ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण भारत, संपूर्ण विश्व राममय झाले आहे. प्रत्येक रामभक्ताच्या अंतःकरणात अद्वितीय समाधान आहे, कृतज्ञता आहे, अपार, अलौकिक आनंदाचा अनुभव आहे. शतकानुशतके झालेले घाव आज भरून निघालेत. कित्येक पिढ्यांची वेदना आज विरामाला आली असून शतकानुशतकांचा संकल्प आज सिद्धीस पोहोचला आहे.
भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवायचे असेल तर आपल्यामध्ये प्रभू श्रीरामाला जागृत करावे लागेल. आपल्या अंतर्मनात रामाची प्राणप्रतिष्ठा करावी लागेल. त्यामुळे प्रत्येकाने ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्ताने याबाबत संकल्प करायला हवा असे आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी केले. ते म्हणाले, भविष्यात अनेक पिढ्यांसाठी हा धर्मध्वज प्रभू श्रीरामांच्या आदर्शांचा आणि तत्त्वांचा उद्घोष करत राहील. हा धर्मध्वज हे आव्हान करत राहील की असत्याचा नाही तर सत्याचाच विजय होतो. हा धर्मध्वज उद्घोष करेल की सत्य हेच ब्रह्माचे स्वरूप आहे आणि सत्यातच धर्माची स्थापना आहे.
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यावेळी म्हणाले, ध्वजारोहणाबरोबरच राम मंदिराचे निर्माण पूर्ण झाले आहे आणि यासाठी ज्यांनी संघर्ष केला पण आपले स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहू शकले नाहीत, असे विश्व हिंदू परिषदचे संरक्षक राहिलेले अशोक सिंघल, महंत रामचंद्र दास परमहंस आणि विष्णु हरि डालमिया, इ. त्या सर्वांच्या आत्म्यांना आज मोक्ष मिळाला असेल. हा धर्मध्वज तोच आहे जो रामराज्याच्या काळात फडकत होता. हा धर्मध्वज आणखी उंच प्रतिष्ठा प्राप्त करो, यासाठी आपला संकल्प असायला हवा. त्यानिमित्ताने आपण असा समाज निर्माण करू ज्यात समरसता असेल आणि देश समृद्धीच्या शिखरावर पोहोचेल. ज्याप्रमाणे सूर्य दररोज उगवतो आणि मावळतो, पण त्याची ही प्रक्रिया कधीही थांबत नाही. त्याचप्रमाणे हिंदू समाजही कधी थांबला नाही, आणि आज ५०० वर्षांनंतर हा केशरिया ध्वज अयोध्येतील राम मंदिरावर फडकताना आपण पाहत आहोत.
राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, धर्मध्वजारोहण हे त्या सत्याचे उद्घोष आहे की रामराज्याचे मूल्य कालजयी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये देशाचे नेतृत्व स्वीकारले त्या दिवसापासूनच भारतवासियांच्या हृदयात विश्वासाचा सूर्योदय झाला होता. आज तीच तपस्या आणि असंख्य पिढ्यांची प्रतीक्षा आपल्या करकमलांद्वारे राम मंदिराच्या स्वरूपात पूर्णत्वाला पोहोचली आहे. श्रीरामाचे भव्य मंदिर, १४० कोटी भारतीयांची आस्था, सन्मान आणि आत्मगौरवाचे प्रतिक आहे. ध्वजारोहणाचा दिवस मंदिर निर्मितीसाठी आपल्या जीवनाची आहुती दिलेल्या प्रत्येकाच्या बलिदानाप्रती समर्पित आहे.
मंदिरावरील धर्मध्वज हा धर्माचा, मर्यादा, सत्य, न्याय आणि राष्ट्रधर्माचा प्रतिक आहे. विकसित भारताच्या संकल्पनेचा प्रतिक आहे. गेल्या ५०० वर्षांत साम्राज्य बदलले, पिढ्या बदलल्या पण आस्था अढळ राहिली. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली अयोध्या उत्सवांची जागतिक राजधानी बनत आहे. येथे जगण्याच्या प्रत्येक दिशेला रामराज्याची दिव्य अनुभूती होत आहे. श्रीराम मंदिराच्या शीखरावरील धर्मध्वजाने एकप्रकारे समाजाला संदेश देण्यात आला की, राम मंदिरात कोणताही बांधकामाचा भाग शिल्लक नाही. मंदिर निर्माणाचा ५०० वर्षांपूर्वी केलेला संकल्प सिद्धीस नेण्यात आला आहे.
राम मंदिरातील ध्वजारोहणापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी परिसरातील सप्तमंदिरात पोहोचले. येथे महर्षी वसिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, महर्षी वाल्मिकी, देवी अहिल्या, निषादराज गुहा आणि माता शबरी यांच्याशी संबंधित मंदिरांत दर्शन घेतले. तत्पश्चात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.