देशाच्या सांस्कृतिक इतिहासात शीख संप्रदायाचे योगदान अतुलनीय असेच. एकाचवेळी शांती आणि शौर्याचा संदेश देणाऱ्या या संप्रदायाने आजवर स्वधर्म आणि स्वदेशासाठी कित्येकदा बलिदान दिले आहे. गुरू तेगबहाद्दूर यांचे बलिदान यासाठीच सदैव स्मरणीय आहे. आज त्यांच्या असलेल्या बलिदान दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला मागोवा...
आज गुरू तेगबहाद्दूर यांचा बलिदान दिन. हिंदू धर्म आणि संस्कृतीसाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या या थोर योद्धा गुरूंना त्यानिमिताने अभिवादन. आजच्या दिवशी म्हणजे दि. 24 नोव्हेंबर, 1675 रोजी, गुरूंनी बलिदान दिले. त्यांच्या या बलिदानातून प्रेरणा घेऊनच, हजारो हिंदू आणि शीख बांधवांनी देश आणि धर्मासाठी त्याग आणि बलिदान दिले आहे. म्हणूनच आपण सर्व आज मानाने जगू शकतोय. दुर्दैवाने आपल्या या अशा राष्ट्रपुरुषांची माहिती, आज आपल्याला फारशी नाही. हा गौरवशाली इतिहास भारतीयांना कळावा अशी ना मुघलांची इच्छा होती, ना इंग्रजांची आणि दुर्दैवाने भारतीय म्हणवणाऱ्या राज्यकर्त्यांची आणि अगदी तथाकथित इतिहासकारांचीही. हा इतिहास खरंतर फार मोठा आणि जाज्वल्य आहे. याची थोडीफार माहिती आपल्या सर्वांना व्हावी हाच या लेखाचा उद्देश.
गुरू तेगबहाद्दूर यांचा जन्म दि. 1 एप्रिल, 1621 रोजी अमृतसर इथे झाला. त्यांचं नाव त्यागमल. सहावे गुरू हरगोविंदसिंह आणि माता नानकी यांचे सर्वात लहान पुत्र असलेल्या त्यागमल यांना, हिंदी, संस्कृत, पंजाबी आदि भाषांचे, हिंदू धर्मग्रंथांचे, ‘गुरूबाणी’चे आणि त्याचबरोबर तलवारबाजी, भालाफेक, घोडेस्वारी इत्यादिंचे प्रशिक्षण लहानपणापासूनच मिळाले होते. तो काळ मुघल सत्तेचा होता. गुरू हरगोविंदसिंह यांनी मुघलांशी लढण्यासाठी सैन्याची उभारणी केली. त्यामुळे तरुणपणापासूनच त्यागमल मुघलांशी लढाया करत होते. त्यांनी करतारपूर इथे मुघलांशी झालेल्या लढाईत गाजवलेल्या पराक्रमामुळे, त्यांना गुरू हरगोविंदसिंह यांनी ‘तेगबहाद्दूर’ असे नाव दिले. ‘तेगबहाद्दूर’ याचा अर्थच मुळी, ‘शूर तलवारबाज’ असा होतो. वडिलांच्या मृत्यूनंतर तेगबहाद्दूर आपल्या आईच्या गावी अर्थात बकाला इथे गेले. तिथे त्यांनी आपला काही काळ नामसंकीर्तन आणि ध्यानधारणेत व्यतीत केल्याचे समजते.
गुरू हरगोविंदसिंह यांच्यानंतर झालेले गुरू म्हणजे, गुरू हरराय आणि गुरू हरक्रिष्ण. गुरू हरक्रिष्ण यांनी मृत्युसमयी सांगितल्याप्रमाणे बकाला इथून गुरू तेगबहाद्दूर यांना बोलावण्यात आले. पुढे त्यांनी नववे गुरू म्हणून गादी सांभाळली. त्यावेळी औरंगजेबाची जुलमी राजवट भारतभर जुलुम करत होती. जबरदस्तीने धर्मांतरण, मंदिरे उद्ध्वस्त करणे, जिझिया कर लादणे, आयाबहिणींवर अत्याचार करण्याचे धोरण त्याने अवलंबिले होते. त्यामुळे देशाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात अस्वस्थता पसरली होती.
औरंगजेबाच्या राजवटीने अत्याचारांचा कळस गाठला होताच, त्याचबरोबर धर्मांतरणाचा उच्छादही मांडला होता. काश्मीरमध्येही त्यांनी काश्मिरी पंडितांवर, धर्मांतरणाची बळजबरी करण्यास सुरुवात केली. त्यांनी विरोध केल्यावर त्यांना मुदत दिली आणि सांगितलं की, “धर्मांतरास तयार व्हा, नाहीतर सर्वांचे शिरकाण केले जाईल.” म्हणजे आजच्या समजणाऱ्या भाषेत मारले जाईल. काश्मिरी पंडित मोठ्या संकटात सापडले आणि आपल्याला या संकटातून कोण वाचवेल, याचा विचार त्यांनी सुरू केला. त्यावेळी त्यांना एकच नाव सुचलं ते म्हणजे गुरू तेगबहाद्दूर! हेच ‘शीख पंथा’चे नववे गुरू.
साधारण 500 पंडित हे पंडित कृपाराम यांच्या नेतृत्वाखाली, ‘चक नानकी’ जे आज ‘आनंदपूर साहिब’ या नावाने ओळखले जाते, या स्थानी गुरुंना भेटायला आले. गुरुंना भेटून त्यांनी काश्मिरी हिंदूंची व्यथा त्यांना सांगितली. गुरूंना त्यांच्या या व्यथेने अत्यंत वेदना झाल्या आणि ते एकदम अंतर्मुख झाले. लहानग्या गोविंदराय यांनी आपल्या वडिलांना, गुरू तेगबहाद्दूरांना त्यांच्या अंतर्मुखतेचे कारण विचारलं. गुरूंनी सांगितलं की, ’या संकटातून बाहेर पडण्यासाठी, एखाद्या महान आत्म्याचे बलिदान व्हावे लागेल.’ नऊ वर्षांचा लहानगा गोविंदराय म्हणाला की, ’यासाठी गुरूंशिवाय अन्य महान आत्मा कोण असू शकतो.’ लहानग्या गोविंदसिंहांचे बोल ऐकून, गुरू स्वतः यासाठी तयार झाले. त्यांनी काश्मिरी पंडितांना सांगितले की, “औरंगजेबाला सांगा की, जर गुरुजी धर्म बदलायला तयार झाले, तरच आम्ही धर्म बदलू!”
गुरू तेगबहाद्दूर यासाठी आपल्या शिष्यांसह दिल्ली येथे गेले आणि त्यांना औरंगजेबाने अटक केली. औरंगजेबाच्या सर्व भारताला धर्मांतरित करून मुस्लीम करण्याच्या कामात, गुरू अडथळा बनून राहिले होते. औरंग्याने त्यांना धर्मांतर करा असे सांगून, त्यांचे हाल करण्यास सुरुवात केली. त्यावेळी एकवेळ प्राण देऊ; पण धर्म सोडणार नाही असे गुरूंनी त्याला ठणकावून सांगितले. कोणीच बधत नाही हे पाहून, औरंगजेबाचे क्रौर्य जागे झाले. आजच्या काळात विश्वास वाटणार नाही असे क्रौर्य! त्याने दिल्लीच्या चांदणी चौकात भाई मतिदास यांना करवतीने कापले, भाई दयाल यांना उकळत्या तेलात टाकले, भाई सतीदास यांना तर जिवंत जाळले आणि तरीही गुरूंनी धर्मांतरणास नकार दिला. यावर औरंगजेबाच्या आदेशाने चांदणी चौकातच, आजच्याच दिवशी म्हणजे दि. 24 नोव्हेंबर, 1675 रोजी गुरू तेगबहाद्दूर यांचे मस्तक उडवण्यात आले. जेथे गुरूंचं मस्तक उडवलं गेलं, त्याचठिकाणी चांदणी चौकात आज ‘शिशगंज गुरुद्वारा’ गुरुद्वारा आहे. गुरुंच्या शिष्यमंडळींनी त्यांचं मस्तकाविना शरीर, तिथून पळवून नेलं. पुढे एका शिष्याच्या घरी ते शरीर नेऊन, औरंग्याचे सैनिक येऊन त्या शरीराचा अपमान करतील म्हणून, त्या घरालाच आग लावण्यात आली. जेथे त्यांच्या शरीरावर अग्निसंस्कार झाले त्याठिकाणीही आज ‘रकीबचंद गुरुद्वारा’ गुरुद्वारा आहे. गुरू तेगबहाद्दूर यांनी धर्मासाठी जे बलिदान दिले, त्यामुळे त्यांना ‘हिंद की चादर’ असेही म्हटले जाते.
अंगावर शहारे आणणारे हे हौतात्म्य, ज्याने हिंदू समाजात आत्मसन्मानाचे स्फुलिंग जागृत केले. शीख संप्रदायाने हिंदू धर्मासाठी जे बलिदान केले, त्याला तोड नाही. गुरू गोविंदसिंह यांच्या त्यागासंबंधी एक गीत आहे. ‘पिता वारियाती लाल चारे वारे... ओ हिंद तेरी शान बदले...’ अर्थात, वडील गुरू तेगबहाद्दूर, स्वतःची चार मुलं आणि स्वतः धर्मासाठी त्याग आणि बलिदान केलेले आहे. आपल्या वडिलांच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन गुरू गोविंदसिंह यांनी, त्यांचे सिद्धांत आणि मूल्य जपत पंथ ‘खालसा’ची स्थापना केली आणि तो पुढे आणखीन वाढवलाही. हा पंथ म्हणजे धार्मिकता आणि अन्यायाच्या विरुद्ध लढल्या जणाऱ्या लढाईचे प्रतीक आहे. खरं म्हणजे हा मोठा गौरवशाली आणि जाज्वल्य इतिहास आहे, त्याची सर्व भारतीयांना जाणीव आणि माहिती व्हायलाच हवी. मंडळी, हा इतिहास माहिती होता का? काहींना असेलही; पण आपल्या देशाचा गौरवशाली आणि जाज्वल्य इतिहास माहिती करून घेणं आवश्यक आहे आणि सर्वांनी तो करून घ्यावा, ही कळकळीची विनंती.