मुंबई : ( Devendra Fadnavis ) " ज्यांची नोट चोरी बंद झाली त्यांना आता मत चोरी आठवत आहे.समोर पराभव दिसत असल्याने निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. मतदार यादी सुधारणेबाबत आम्ही पण आवाज उठवला आहे. पण दुबार नाव असलेल्यांनी,मतदान दोन्हीकडे केलेले आहे हे विरोधकांनी सिद्ध करून दाखवावे. मतदार संघात मत चोरी करूनच विरोधक निवडून आले आहेत असे प्रकार खूप झाले आहेत. ते आम्हाला माहिती आहेत.ते आम्हीही दाखवून देऊ." असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदार यादीतील घोळबाबतच्या ठाकरे बंधू आणि मविआच्या शनिवार दि.१ रोजीच्या मुंबई येथील मोर्चावर केला. बिहार येथे विधानसभा निवडणूक एन डी ए घटकपक्ष भाजपा प्रचारासाठी प्रभारी म्हणून गेले असता प्रसारमाधमांशी ते बोलत होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार दि.३१ पासून बिहार विधानसभा निवडणूक प्रचारासाठी विविध विधानसभा क्षेत्रात मतदारांशी संवाद साधण्यासाठी एन डी ए घटकपक्ष भाजपा प्रभारी म्हणून बिहार दौऱ्यावर गेले आहेत.२०२० साली ते भाजपा प्रभारी म्हणून बिहार विधानसभा निवडणुकीत गेले असता भारतीय जनता पक्षाला चांगल यश प्राप्त झाले होते.
हेही वाचा : पर्यावरणाची वारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पंढरपुरात साजरी
"बिहार मध्ये एन डी ए काळात मोठ्या प्रमाणात विकास झाला असून, २०२० ते २०२५ याकाळात बिहार पण चांगले सुधारले आहे. यामुळे बिहार मधून रोजगारासाठी बाहेर जाणाऱ्यांची संख्या गतीने कमी होत आहे. पाटण्याचे विमानतळ आज आंतरराष्ट्रीय विमानतळ वाटत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या एका राज्यात व्यवसाय उद्योगाच स्वरूप न वाढवता संपूर्ण देशभर उद्योग वाढविले आहेत.त्यामुळे एन डी ए काळात आज आसाम , बिहार याठिकाणी मोठ्या उद्योग ,व्यवसायातून रोजगार वाढले आहेत. आता एन डी ए ची स्थिती पण चांगली आहे.आता एन डी ए एकत्र आणि बळकट आहे."असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.
"देशभर महिला मतदार या सर्वात जास्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकास कामावर विश्वास ठेवतात. बिहार मधील जनतेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासुन प्रेम आहे. नितीश कुमार यांनी बिहारमध्ये लोकांची सेवा केली आहे,भ्रष्टाचार केला नाही , परिवारवाद केला नाही. त्यामुळे यावेळीही नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा लोक विश्वास ठेवत आहेत. बिहार मधील जंगलराज कमी करणारे नितीश कुमारच पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होतील. चिराग पासवान यांची साथ आम्हाला मिळाली आहे त्यामुळे अजून बळकटी आली आहे."असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बिहार येथील विविध जनसभाना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.