मुंबई : (State Level Elocution Competition) वक्तृत्व हे केवळ बोलण्याचे कौशल्य नसून, विचार मांडण्याची, लोकांसमोर संवाद साधण्याची आणि समाजाला दिशा देण्याची ताकद आहे. या उद्देशाने महर्षी दयानंद एज्युकेशन सोसायटी संचालित महर्षी दयानंद कनिष्ठ महाविद्यालयात दिवंगत “कै. डॉ. अविनाश कारंडे यांच्या स्मरणार्थ” राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे (State Level Elocution Competition) आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडणार आहे. सदर कार्यक्रमासाठी महा एमटीबी डिजिटल माध्यम सहयोगी आणि महाराष्ट्र टाइम्स हे मुद्रित माध्यम सहयोगी आहे.
हा कार्यक्रम ११ वी व १२ वी च्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खुला असून, विजेत्यांना आकर्षक पारितोषिक (प्रथम रु. ५०००/-, द्वितीय रु. ३०००/, तृतीय रु. २०००/-) आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. (State Level Elocution Competition)
“युवा पिढीमध्ये संवादकौशल्य आणि नैतिक विचारांची जोपासना करणे हे अतिशय गरजेचे आहे. अशी स्पर्धा विद्यार्थ्यांना केवळ भाषिकच नव्हे तर सामाजिक जबाबदारीच्या दृष्टीनेही प्रबळ बनवते,” असे मत महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ मनीषा आचार्य यांनी व्यक्त केले व ही स्पर्धा म्हणजे विचारांना विवेकाची जोड देण्याचे एक व्यासपीठ आहे.” असे कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य धर्मेश मेहता यांनी म्हटले आहे. (State Level Elocution Competition)
या स्पर्धेसाठी देण्यात आलेले विषय पुढीलप्रमाणे,
पर्यावरणाची सुरक्षा : जबाबदारी कोणाची?
शिवी : ‘कूल’ पिढीची नवी भाषा?
२१व्या शतकातील शिक्षणाची गरज : गुणपत्रिका की कौशल्य?
वेगवान जगात नैतिक मूल्यांचे महत्त्व
अपघात : नुसती आकडेवारी की कुटुंबाची वेदना?
शिवरायांचे गडकिल्ले – स्वराज्याचे आधारस्तंभ
मराठी शाळा टिकवण्याची जबाबदारी कोणाची?
सोशल मीडिया : शाप की वरदान?
हे वाचलात का ? : अजिंक्य नाईक दुसऱ्यांदा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी! निवडणुकीत बिनविरोध निवड
या स्पर्धेसाठी महर्षी दयानंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा कवल वर्मा आणि सचिव सोनिया गांधी ओके यांनी परवानगी देत शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यक्रमाचे आयोजन प्रभारी प्राचार्या डॉ. मनीषा आचार्य, उपप्राचार्य (प्रशासकीय विभाग) प्रा. बी. टी. निकम, उपप्राचार्य धर्मेश मेहता, पर्यवेक्षक मनोज सिंग, तसेच प्राचार्य सल्लागार समिती सदस्य कुऱ्हाडे आणि अनिजू थॉमस यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. तर मुख्य आयोजन इतिहास विभागाचे सुशांत भोसले आणि त्यांची टीम करत आहे. (State Level Elocution Competition)
विद्यार्थ्यांनी स्पर्धेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सुशांत भोसले - (८४२४८१२३०) यांना संपर्क साधावा.