राष्ट्र उभारणीच्या महायज्ञाचा शतकोत्सव...

06 Oct 2025 11:20:02

रा. स्व. संघाने नुकतेच शंभरीत पदार्पण केले. गेली शंभर वर्षे संघ राष्ट्रसेवा या भावनेने समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात वावरला. ‘सख्यासी आईसाठी जोडावे’ या न्यायाने प्रत्येक भारतीयाला राष्ट्रसेवेमध्ये जोडून घेत आला. त्यामुळेच अनेक संकटे येऊनदेखील संघ विस्तारतच राहिला. संघाच्या या देदिप्यमान प्रवासाचा घेतलेला आढावा...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १००व्या वर्धापन दिनाला उत्सवाऐवजी, आत्मपरीक्षण आणि पुनर्समर्पणाचा क्षण मानतो. या मार्गात निःस्वार्थपणे सामील दूरदर्शी स्वयंसेवकांच्या प्रयत्नांना ओळखण्याची, ही एक संधी आहे. १००व्या वर्षी संघ भारतासाठी पूर्वीपेक्षा खूपच महत्त्वाचा वाटतो आहे. सुरुवातीला, संघाला समाजात दुर्लक्ष आणि विरोधाशिवाय काहीही मिळाले नाही, स्वयंसेवक ही मोजकेच होते. तथापि, राष्ट्राच्या विभाजनादरम्यान आणि संघबंदीदरम्यान हिंदू समाज आणि राष्ट्र जपण्याच्या अडचणींना न जुमानता, संघ चिकाटीने उभा राहिला आणि एक लवचिक शक्ती म्हणून उदयास आला.

१९५० सालापर्यंत हे स्पष्ट झाले की, संघाचे कार्य सुरू राहील, वाढेल. १९७५ सालच्या आणीबाणीच्या काळात लोकशाही पुनर्संचयित करण्यात, संघाच्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे समाजाला राष्ट्राप्रति असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेचे मूल्य समजले. नंतर, एकात्म रथयात्रा, काश्मीरशी संबंधित जागरण, श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलन आणि विवेकानंदांची १५०वी जयंती तसेच, सेवा उपक्रमांचा मोठ्या प्रमाणात विस्तार यांसारख्या अनेक समाज व राष्ट्र घडवणार्‍या कृत्यांमुळे, संघ विचारसरणी आणि संघाबद्दलची विश्वासार्हता समाजात वेगाने पसरली.

‘संस्थापक’, ‘डॉक्टर’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना खात्री होती की, केवळ राजकीय सक्रियता मुख्य समस्या दूर करू शकणार नाही. परिणामी त्यांनी व्यक्तींना राष्ट्रसेवा हेतूने कार्य करण्यासाठी, सतत प्रयत्नांची रणनीती विकसित करण्याचा संकल्प केला. या कल्पनाशील विचारसरणीमुळे, शाखा तंत्राचा विकास झाला. डॉ. हेडगेवारांनी संपूर्ण समाजात संघटना तयार करण्याऐवजी, समाजाला संघटित करण्यासाठी एक प्रशिक्षण प्रणाली तयार केली. १०० वर्षांनंतरही हजारो तरुण डॉ. हेडगेवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून, राष्ट्रीय कार्यासाठी स्वतःला समर्पित करण्यास उत्सुक आहेत. संघाची स्वीकारार्हता वाढत आहेत. हे फक्त डॉ. हेडगेवार यांच्या दृष्टिकोनाला पाठिंबा दर्शवणारे संकेत आहेत.

१९४० साली संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी आपला देह सोडला, आणि ‘श्रीगुरुजी’ म्हणून ओळखले जाणारे एम. एस. गोळवलकर हे रा. स्व. संघाचे दुसरे सरसंघचालक झाले. त्यांनी पुढील ३३ वर्षांत एका सामान्य संघटनेला अखिल भारतीय रुप दिले. त्यांच्या नेतृत्वाखालीच संघाने ‘भारतीय मजदूर संघ’, ‘विश्व हिंदू परिषद’, ‘अभाविप’, ‘भारतीय जनसंघ’ अशा तिच्या संलग्न संघटना स्थापन केल्या. . गेल्या शतकात तीन वेळा रा. स्व. संघावर १९४८, १९७५ आणि १९९२ साली बंदी घालण्यात आली. महात्मा गांधींच्या हत्येनंतर १९४८ साली, आणीबाणीच्या काळात १९७५ साली आणि १९९२ साली अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या जन्मस्थळावरील वादग्रस्त बाबरी मशीद पाडल्यानंतर संघटनेला बेकायदेशीर ठरवण्यात आले. या तिन्ही बंदी अल्पावधीतच उठल्या.

संघ ही एकमेव संघटना आहे, जी सरकार आणि अनेक माध्यमांचा विरोध असतानाही टिकून राहिली आणि वाढली. कोणतेही सरकार त्यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही, कोणत्याही न्यायालयात संघाला दोषी ठरवू शकले नाही. संघाला निर्बंध आणि द्वेषाचा सामना करावा लागला, तरीही तो टिकून राहिला आणि भरभराटीला आला. कारण, तो महत्त्वाकांक्षेवर नाही, तर सत्य आणि सेवेवर आधारित कार्य करीत आहे. १९४९ साली बंदी उठवल्यानंतर, संघाचे संविधान लिहिले गेले. १९७५-७७ दरम्यान संघाने पुढाकार घेऊन, लोकशाही पुनर्संचयित करण्यासाठी भूमिगत संघर्षाचे नेतृत्व केले आणि जगभरात त्यांच्या योगदानाचे कौतुक झाले. माजी ’रॉ’ प्रमुख ए. के. वर्मा म्हणाले, “मी रा. स्व. संघाकडे काँग्रेस ज्या पद्धतीने पाहतो, त्या पद्धतीने पाहत नाही.

संघामध्ये नेमके काय चूक आहे? हिंदू समुदायाचा सन्मान पुनर्संचयित करणे, हा त्यांचा एकमेव उद्देश आहे. ज्यांना ते समजत नाही, ते संघाचा विरोध करतात. ते प्राचीन सांस्कृतिक तत्त्वे स्थापित करत आहेत, चांगले काम करत आहेत.” फाळणी काळात देशाच्या रक्षणासाठी संघ स्वयंसेवकांनी दिलेले बलिदान,भारतीय इतिहासात विशेष कौतुकास पात्र आहे. स्वातंत्र्य लढ्यादरम्यान आंदोलनात सहभागी होऊन संपूर्ण वातावरण तापवणे असो, पाकिस्तानच्या लष्करी कारवाया आणि काश्मीर आक्रमणाच्या शक्यतेबद्दल माहिती गोळा करणे असो, किंवा प्रसिद्ध ‘कोटली हुतात्मा’ घटना असो, प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवकांनी मातृभूमीच्या सन्मानार्थ बलिदान दिले आहे.

रा. स्व. संघाचे उघडपणे टीकाकार असलेले प्रसिद्ध पत्रकार कुशवंत सिंह यांनी म्हटले होते की, “१९८४ सालच्या भयंकर शीखविरोधी दंगलींमध्ये, जिथे सरकारी यंत्रणाही अपयशी ठरली होती. दिल्लीत मारेकर्‍यांनी शिखांना मारण्यासाठी जोरदार हल्ला चढवला, तेव्हा रा. स्व. संघाने मोठ्या संख्येने शिखांना मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.” १९६२ सालच्या चीन-भारत युद्धादरम्यान, संघाने महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्या कठीण काळात सैन्य आणि गावकर्‍यांना मदत करण्यासाठी, देशभरातील स्वयंसेवक भारताच्या ईशान्येला एकत्र आले. १९६३ साली तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये सहभागी होण्यासाठी रा. स्व. संघाला आमंत्रित केले, तेव्हा संपूर्ण देशाने त्यांच्या समर्पित वचनबद्धतेचा सन्मानच केला. गोवा, दादरा आणि नगर हवेलीला ‘पोर्तुगीज प्रदेश’ म्हणून आंतरराष्ट्रीय मान्यता, स्वातंत्र्यानंतरही कायम राहिली.

भारतीय प्रदेश सोडण्यास वसाहतवाद्यांच्या अनिच्छेला, संघाने विरोध केला आणि या भागांना वसाहतमुक्त करण्याच्या मोहिमांमध्ये भाग घेतला. दादरा आणि नगर हवेली मुक्त करण्यासाठी, एप्रिल १९५४ साली, संघाने ‘आझाद गोमंतक दल (एजीडी) आणि ‘नॅशनल मूव्हमेंट लिबरेशन ऑर्गनायझेशन’ (एनएमएलओ)सोबत हातमिळवणी केली. १९५५ साली संघाच्या नेत्यांनी, गोव्याला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य आणि भारतात समाविष्ट करण्याची मागणी केली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी सशस्त्र हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानंतर, संघ नेते जगन्नाथराव जोशी यांनी थेट गोव्यात सत्याग्रह आंदोलन केले. पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना तुरुंगात टाकल्यवरही अहिंसक निदर्शने सुरूच राहिली. परंतु, ती हिंसकपणे दडपण्यात आली. नरोली आणि फिपरिया हे भाग तसेच सिल्वासाची राजधानी, संघ आणि ‘एजीडी’च्या स्वयंसेवकांनी ताब्यात घेतली.

आजही भोपाळ गॅस दुर्घटना, आसाम दंगली, वेगवेगळ्या भागांतील रेल्वे अपघात किंवा तामिळनाडूतील त्सुनामी, गुजरातमधील भूकंप, आंध्र प्रदेशातील पूर किंवा उत्तराखंडातील पूर यांसारख्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी, संघ स्वयंसेवक गरजूंना मदत करण्यात आघाडीवर असतात. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्या. के. टी. टॉमस यांच्या मते, “जर एखाद्या संघटनेला आणीबाणीतून देशाला मुक्त करण्याचे श्रेय द्यायचे असेल, तर मी ते रा. स्व. संघाला देईन.” असेही त्यांनी म्हटले आहे की, “राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी रा. स्व. संघ आपल्या स्वयंसेवकांमध्ये शिस्त निर्माण करतो.

शारीरिक शक्ती धोक्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आहे, या रा. स्व. संघाच्या शिकवणी आणि विश्वासाचे मी कौतुक करतो. मला समजते की, रा. स्व. संघाचे शारीरिक प्रशिक्षण हल्ल्याच्या वेळी राष्ट्राचे आणि समाजाचे रक्षण करण्यासाठी आहे.” मध्यमार्ग, अतिरेकी मार्ग नाही विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी अनेक राष्ट्रांतील राजदूतांसह समाजातील १ हजार, २०० हून अधिक प्रभावशाली सदस्यांशी बोलताना, संघाचा दृष्टिकोन स्पष्ट केला. त्यांनी स्पष्ट केले की, संघ सामाजिक संतुलन पुनर्संचयित करण्याचा आणि सर्व प्रकारच्या कट्टरतावादाला रोखण्याचा प्रयत्न करतो.

डॉ. भागवतजींच्या मते, संघ भारतीय परंपरेनुसार मध्यम मार्गाचा समर्थक आहे. हा मध्यवर्ती मार्ग ‘धर्म’ आणि ‘भारतीय संस्कृती’ या संकल्पनेवर आधारित आहे, ज्याला ‘रिलिजन’ समजून गोंधळात टाकू नये. आजच्या समाजात, संघ पंचपरिवर्तन तत्त्वांद्वारे दैनंदिन जीवनात या ‘धर्माचे’ मूर्त स्वरूप कल्पित करतो. यामध्ये सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण जागरूकता, नागरी शिष्टाचार आणि स्वबोध यांचा समावेश आहे. या विचारसरणीचा प्राथमिक आधार ‘धर्म’ आहे. समाजाची राजकीय दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची प्रवृत्ती असली, तरी संघ सर्वांना सोबत घेण्यावर लक्ष केंद्रित करतो. संघाने सामाजिक विकासात महिलांच्या सहभागावर आणि कुटुंब संस्थेच्या पावित्र्याच्या पुनर्संचयनावर लक्ष केंद्रित केले आहे.


लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीसारख्या समारंभात लाखो लोक सहभागी झाले होते. यातून राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करण्यावर संघाचा भर असल्याचे स्पष्त होते. संघ आधुनिकीकरणाला समर्थन देतो. परंतु, सर्व प्रकारच्या पाश्चात्यकरणाला विरोध करतो. संघाच्या मते, आपण दुसर्‍याची संस्कृती आयात करण्यापेक्षा, आपली स्वतःची संस्कृती आधुनिक केली पाहिजे. संघाचा असा विश्वास आहे की, ज्ञान आणि समृद्धीचा भव्य वारसा असूनही शत्रूबोधबद्दलची जाणीव गमावल्यामुळे, भारत गुलाम झाला. राष्ट्राचे उत्थान आणि बळकटीकरणासाठी आपण लोकांना एकत्र केले पाहिजे, जे त्यांना त्यांच्या भव्य भूतकाळाची जाणीव करून साध्य केले जाऊ शकते. अन्यथा, भविष्यात आपण आपली ओळख गमावू आणि इतर धार्मिक कट्टरपंथीयांच्या ताब्यात जाऊ.

आपली जीवनशैली विकृत होईल आणि म्हणूनच संघ त्याचे रक्षण करण्यासाठी दृढनिश्चयी आहे. अंतिम ध्येय म्हणजे, भूतकाळातील वैभव पुनर्संचयित करणे आणि आजच्या पिढीला पाश्चात्यकेंद्रित गुलामगिरीच्या मानसिकतेपासून मुक्त करणे. संघ राज्य करण्याच्या महत्त्वाकांक्षेने प्रेरित नाही, तर समाज आणि राष्ट्राची सेवा करण्याच्या आणि उन्नत इच्छेने प्रेरित आहे. याचा मूळ पाया धर्म-सामाजिक सेवा आहे, जो ती संस्कृतीच्या मूल्यांशी आणि संविधानिक आधारांशी सुसंगत ठेवतो. अशाप्रकारे, शताब्दी केवळ एक वर्धापन दिन नाही; ती एक तात्विक मैलाचा दगड ठरते. नैतिक सार्वत्रिकता, समावेशकता आणि सांस्कृतिक मूळ हे भारतीय समाजात दीर्घकालीन प्रासंगिकतेचे पाया आहेत.

समावेशकता ही भारताच्या संस्कृतीच्या आकांक्षा आणि ऐतिहासिक वारशात रुजलेली, एक मूलभूत नैतिक आणि तात्विक भूमिका आहे. समावेशकता भारतीयत्ववर विश्वास ठेवते आणि म्हणूनच जात, पंथ, धर्म आणि राजकीय संलग्नता ओलांडते. संघाचे ध्येय कोणालाही वगळणे नाही, तर संपूर्ण समाजाचे संघटन करणे आहे. ‘हिंदू’ हा शब्द समावेशकतासुद्धा दर्शवितो. हिंदू धर्माची संकल्पना कठोर धार्मिक पदनाम नाही, तर संस्कृती, अध्यात्म आणि सामायिक वंशावर आधारित एक विशाल संस्कृतीत्मक नीतिमत्ता आहे. डॉ. मोहनजी भागवत यांनी अधोरेखित केले की, “हिंदू धर्म धर्माच्या पलीकडे जाऊन सामायिक भूगोल, इतिहास आणि आध्यात्मिक परंपरांवर आधारित संस्कृतीची ओळख दर्शवतो.

अनेक साधक आणि धर्म न मानणार्‍या हिंदूंसाठी संघ हा दीर्घकाळापासून एक कोडे आहे; सहज समजले जाणारे आणि गैरसमजही. त्याची विशिष्ट कार्यसंस्कृती आणि परोपकारी, स्वयंसेवकचालित संघटना भारताच्या संस्कृतीच्या परंपरेतून बळ मिळवते, ज्याने अनेक संकटांना तोंड दिले आहे. २०४७ सालापर्यंत ‘विकसित भारत’ आणि ‘विश्वगुरू’ बनवण्याच्या भारतीयांच्या आकांक्षांना संपूर्ण समाजाचा पाठिंबा, विविध क्षेत्रांतील सज्जनशक्ती आणि आदरणीय संत समाज आणि विविध सरकारांनी पुढे येऊन, एक महान राष्ट्र निर्माण करण्यासाठी संघ आणि इतर अनेक संघटनांसोबत काम करण्याची आवश्यकता आहे. वेळ कमी आहे आणि कार्य मोठे आहे, म्हणून ‘राष्ट्र प्रथम’ भावना राखताना सहयोग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”




- पंकज जयस्वाल


Powered By Sangraha 9.0