प्रलोभनाने केलेले धर्मांतरण सांस्कृतिक अस्मितेला धक्का देणारे; स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांचे प्रतिपादन

05 Oct 2025 13:48:27

मुंबई : फसवणूक, बळजबरी व प्रलोभनाने केलेले धर्मांतरण हे केवळ वैयक्तिक स्वातंत्र्याचे हनन नसून समाजाच्या सांस्कृतिक अस्मितेलाही धक्का देणारे आहे", असे प्रतिपादन अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी केले.

अखिल भारतीय संत समिती तर्फे ठाणे पश्चिम येथील शासकीय विश्रामगृहामध्ये “धर्मस्वातंत्र्य आणि धर्मांतरण” या विषयावर शनिवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

माध्यमांना संबोधत ते म्हणाले, भारताची महानता त्याच्या विविधतेमध्ये आहे. हजारो वर्षांपासून येथे विविध पंथ, परंपरा व संप्रदाय फुलत-फळत आले आहेत. या विविधतेचा पाया धर्मस्वातंत्र्य असून प्रत्येकाला आपल्या श्रद्धेनुसार जीवन जगण्याचा व पूजापद्धती अवलंबण्याचा अधिकार आहे. हेच स्वातंत्र्य भारताला जगातील सर्वात प्राचीन व सजीव सभ्यता बनवते. आज हेच स्वातंत्र्य धर्मांतरणाच्या स्वरूपात गंभीर संकटास सामोरी जात आहे.

पुढे ते म्हणाले, भारतीय संविधानातील कलम २५ नुसार प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन व प्रचार करण्याचे स्वातंत्र्य आहे; परंतु हे स्वातंत्र्य जनव्यवस्था, नैतिकता व आरोग्याच्या अधीन आहे. याचा थेट अर्थ असा की, प्रत्येक व्यक्ती आपली श्रद्धा ठेवू शकतो. तिचा प्रचार-प्रसार करू शकतो. परंतु दडपण, लालच किंवा फसवणूक करून कोणावर धर्म लादणे अयोग्य व असंवैधानिक आहे. म्हणून धर्मस्वातंत्र्याचा खरा अर्थ केवळ धर्म बदलण्याची मोकळीक नसून, आपल्या धर्म व श्रद्धेत सुरक्षित राहण्याचा मूलभूत अधिकार हा देखील आहे.

धर्मांतरण : स्वातंत्र्य नव्हे, अपराध

इतिहास साक्षी आहे की फसवणूक, बळ व लालच यामुळे झालेले धर्मांतरण समाजात फूट व संघर्षाचे कारण बनले. मध्ययुगात तलवारीच्या जोरावर झालेल्या धर्मांतरणामुळे भारताच्या असंख्य परंपरा नष्ट झाल्या. आज परकीय पैसा व मिशनऱ्यांच्या जोरावर गावे, जंगले व गरिबीने ग्रस्त वस्त्या लक्ष्य केल्या जात आहेत. पिढ्यान्पिढ्या भारतीय संस्कृतीशी जोडलेला समाज प्रलोभन व खोटेपणाच्या आधारावर तोडला जात आहे, असे स्वामीजींनी सांगितले.

हे धार्मिक स्वातंत्र्य नसून धार्मिक गुलामगिरीचे आधुनिक रूप.

भारतामधील मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हिमाचल, गुजरात, ओडिशा, छत्तीसगड इत्यादी राज्यांनी धर्मस्वातंत्र्य अधिनियम बनवले आहेत. या कायद्यांचा उद्देश आस्था हिरावून घेणे नसून फसवणूक, बळ व प्रलोभनाद्वारे होणारे धर्मांतर रोखणे हा आहे. या अधिनियमांनुसार जर कोणी खरोखर आपल्या विवेकबुद्धीने धर्म बदलू इच्छित असेल, तर त्याने प्रशासनाला कळवणे आवश्यक आहे, जेणेकरून त्याच्यावर कोणतेही दडपण किंवा प्रलोभन आणले गेलेले नाही याची खात्री होईल. धर्मस्वातंत्र्य अधिनियम हे स्वातंत्र्य रोखणारे नाहीत, तर त्याचे रक्षण करणारे आहेत.


Powered By Sangraha 9.0