सातत्याने असत्य बोलणाऱ्या विरोधकांचा एक नोव्हेंबरचा असत्याचा मोर्चा : नवनाथ बन

31 Oct 2025 14:55:34
 
Navnath Ban
 
मुंबई : ( Navnath Ban ) "सातत्याने असत्य बोलणाऱ्या विरोधकांचा एक नोव्हेंबरचा असत्याचा मोर्चा असून,इथल्या व्यवस्थेवर विश्वास नसेल तर मविआ आपल्या खासदार आमदारांचा राजीनामा घेणार आहेत का ? उबाठा गटाच्या वतीने तर फॅशन स्ट्रीट वरून जाणार आहेत कारण त्यांना हिंदू नावाची ॲलर्जी आहे.म्हणून हिंदू जिमखाना ऐवजी फॅशन स्ट्रीट येथून फॅशन शो केला जाणार आहे कारण आदित्य ठाकरेंना पब, पेंग्विन आणि पार्टीत जास्त रस आहे."असा घणाघात नवनाथ बन यांनी शुक्रवार दि.३१ रोजी भाजपा प्रदेश कार्यालय,मुंबई येथे केला.
 
"राज ठाकरेंनी लोकल ने सहभागी होण्याऐवजी मेट्रोने जाऊन मुंबईकरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आरामदायी प्रवासाच्या सुविधा आणि विकास पहावा.तसेच गड, किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच आणि वैभवाच प्रतिक आहे.कुठेही किल्ल्याच नाव बदलल जाणार नाही. उलट नमो टुरिझम केंद्रातून सर्वसामान्य गडप्रेमींना गड किल्ल्यांवर सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.यातून पर्यटनाला चालना मिळेल. विठ्ठलाच्या मंदिरात नामदेव पायरी असते तशी ही सुविधा केंद्र आहेत,या स्थळांवर सुविधा उपलब्ध व्हाव्यात ही मागणी ठाकरेंची पण होती त्यामुळे आताचा त्यांचा हा विरोध चुकीचा आहे." असे स्पष्टीकरण बन यांनी दिले.
 
हेही वाचा : ५०४ बेपत्ता बांग्लादेशींविरुद्ध गुन्हा दाखल; किरीट सोमय्या यांची माहिती
 
"गुरुवार दि.३० रोजी १७ निष्पाप मुलांना ओलीस धरणाऱ्या माथेफिरू रोहित आर्याचा एन्काऊंटर करणाऱ्या आणि सर्व मुलांना सुरक्षित बाहेर काढणाऱ्या मुंबई पोलिसांच आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच मी अभिनंदन करतो. पहलगाम मध्ये धर्म विचारून दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांची हत्या केली त्यावेळी सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केले होते. आताही आर्या या गुन्हेगाराची बाजू घेणारे वडेट्टीवार हे विरोधी पक्ष नेते आहेत की गुन्हेगाराचे नेते आहेत." असा प्रश्न बन यांनी केला.
 
"आमचे सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणारे आहे. गुरुवार दि. ३० रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बच्चू कडू यांच्यात बैठक पार पडली आणि यात कर्जमाफीबाबत जूनपर्यंत एक समिती स्थापन करण्यात आली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने शेतकऱ्यांना केली आहे. फसवी आणि कागदोपत्री कर्ज माफी करणार सरकार उद्धव ठाकरे आणि मविआचे होते." असेही बन म्हणाले.
 
"राज ठाकरे सातत्याने वेगवेगळी भूमिका घेत असतात.२०१४ साली त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला होता. परत भूमिका बदलत २०१९ साली मविआला पाठिंबा दिला.२०२४ साली पुन्हा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. कदाचित महापालिका निवडणुका लागल्यानंतर पुन्हा त्यांची भूमिका बदलेल." असे मत नवनाथ बन यांनी राज ठाकरे यांच्या आणि मनसेच्या भूमिकेवर व्यक्त केले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0