सागरी मच्छीमार जनगणना ३ नोव्हेंबरपासून; कोळीवाड्यांमध्ये प्रशिक्षणाला सुरुवात

    30-Oct-2025
Total Views |

Maharashtra fisherman survey

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - १२ लाख मच्छीमार कुटुंबांचा समावेश असणाऱ्या देशाच्या पाचव्या राष्ट्रीय सागरी मच्छीमार जनगणनेला महाराष्ट्रात ३ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे (Maharashtra fisherman survey). आयसीएआर-सीएमएफआरआय आणि महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभागाच्या संयुक्त विद्यमाने १८ डिसेंबरपर्यंत ही गणना पार पडले. यासाठी VyAS-NAV डिजिटल अॅप वापरण्यात येणार आहे (Maharashtra fisherman survey). डिजिटल माध्यमाद्वारे डेटा संकलन करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेल्या या अॅपमुळे गणनेतील पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यास मदत होणार आहे (Maharashtra fisherman survey).


केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या वित्तीय सहाय्याने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत पाचवी राष्ट्रीय सागरी मच्छीमार जनगणना केली जाणार आहे. किनारपट्टीवरील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १२ लाख मत्स्यव्यवसायिक कुटुंबे, मत्स्य गावे आणि मत्स्य उतरण केंद्रांबद्दलअचूक आणि तात्काळ माहिती संकलित केली जाईल. प्रथमच, आर्थिक स्थिती, विविध उपजीविकाआणि शासन योजनांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती एका अत्याधुनिक ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे गोळा केली जाणार आहे. मच्छीमार कुटुंबांचा समावेश असलेली ही व्यापक माहिती संकलनाची प्रक्रिया नोव्हेंबरमध्ये सुरू होईल. ४५ दिवसांमध्ये ही गणना केली जाईल. या गणनेसाठी VyAS-NAV नामक अॅप विकसित करण्यात आले आहे. गणनेसाठी पारंपरिक पद्धतीतून अॅप-आधारित डिजिटल प्रणालीकडे होणारा हा मोठा बदल आहे.


या गणनेसाठी महाराष्ट्रातील विविध सागरी मत्स्य गावांमध्ये गणना प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील विविध किनारी मत्स्य गावांमध्ये गणना प्रशिक्षण टप्प्याला औपचारिक सुरुवात करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण तयारीच्या टप्प्यात, गणक आणि पर्यवेक्षकांना सामाजिक-आर्थिक, उपजीविका आणि मत्स्य व्यवसायाशी संबंधित माहिती VyasNAV डिजिटल प्लॅटफॉर्म आणि टॅबलेट पीसीच्या माध्यमातून अचूकपणे संकलित करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षण सत्रांचा उद्देश माहिती संकलनातील एकसंधता सुनिश्चित करणे, समन्वय बळकट करणे आणि मत्स्य कुटुंबे, मत्स्य उतरण केंद्रे आणि मत्स्य व्यवसायाशी निगडित कामांना मिळणाऱ्या माहितीत अचूकता व विश्वासार्हता वाढवणे हा आहे.

'सीएमएफआरआय'ने विशेषतः मोबाईल आणि टॅबलेटवर आधारित हे अॅप विकसित केले असून त्याद्वारे डेटा संकलन सुलभ होईल. त्याचबरोबर मानवी चुका कमी करून धोरणात्मक उपयोगासाठी डेटा संकलन जलदगतीने पूर्ण करता येईल. या अॅपच्या माध्यमातून मासेमारी गावे, मासेमारी केंद्रे व मत्स्य बंदरांची माहिती पडताळणीसाठी वापरण्यात येईल. यामध्ये प्राथमिक आणि दुय्यम स्रोतांद्वारे गावांचा संक्षिप्त अहवाल तयार करण्याची क्षमता आहे. या अॅपच्या पर्यवेक्षणाचे काम सीएमएफआरआय, भारतीय मासेमारी सर्वेक्षण विभाग आणि किनारी राज्यातील मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचारी करतील. मच्छिमारांच्या लोकसंख्यात्मक आणि सामाजिक-आर्थिक स्थिती, पर्यायी उपजीविका आणि सरकारी योजनांचा प्रभाव या सर्व गोष्टी ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्मव्दारे नोंदविल्या जातील.