मुंबई : ( Mangal Prabhat Lodha ) राष्ट्रभक्ती आणि देशप्रेमाची प्रेरणा देणाऱ्या 'वंदे मातरम' गीताला विरोध करणाऱ्या अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. आझमी यांनी वंदे मातरम गीताला विरोध दर्शवत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे, त्यावर लोढा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
अबू आझमी यांनी वंदे मातरम गीताला विरोध करून कोट्यवधी भारतीयांच्या भावनांचा अपमान केला आहे. त्यांच्या वक्तव्यात विघटनवादी प्रवृत्ती दिसून येत असून यावर कडक कारवाई व्हायला हवी. आम्ही राष्ट्रभक्तीच्या भावनेने वंदे मातरम म्हणणारच,तसेच आझमी यांच्या मानखुर्द मतदार संघातही मोठ्या प्रमाणात सामूहिक वंदे मातरम गीताचे आयोजन करून आझमी यांनाही निमंत्रित करू, या कार्यक्रमाला त्यांनी विरोध करून दाखवावा असे आव्हानही मंत्री लोढा यांनी आझमी यांना दिले आहे.
हेही वाचा : आसाम काँग्रेस सेवा दलाच्या बैठकीत बांग्लादेशाच्या राष्ट्रगीताचे गायन
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ७ नोव्हेंबर १८७५ साली हे गीत अजरामर केले. त्या घटनेला ७ नोव्हेंबरला १५० वर्ष पूर्ण होत असून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या मार्गदर्शनात राज्यभर कौशल्य विभागाकडून सार्ध शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येत आहे. विद्यापीठ, आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र तसेच शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सामूहिक गीतगायन, देशभक्तीपर भाषणे,निबंध लेखन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्य स्तरीय तसेच तालुका स्तरावर समित्याही स्थापन करण्यात आल्या असल्याची माहितीही मंत्री लोढा यांनी दिली.