नागपूर : (Chandrashekhar Bawankule) "उद्धव ठाकरे यांची मानसिकता विकृत झाली आहे, त्यांच्या भाषणाला जनता आता गंभीरतेने घेत नाही", अशी टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांची मानसिकता विकृत झाली आहे. निवडणुकीत पराभवानंतर ते मानसिक दबावाखाली आहेत. विजयादशमीला केलेले त्यांचे भाषण ही विकृती दर्शविणारे होते. त्यामुळे आता महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता त्यांना गंभीरतेने घेत नाही"
"महाराष्ट्राला समजले आहे की कोण खरं आणि कोण खोटं. भाजपला लक्ष्य करण्याचे कारण म्हणजे आज भाजपकडे ५१ टक्के मते घेण्याची क्षमता आहे. उद्धव ठाकरेंना माहित आहे की भाजपवर बोलल्याशिवाय त्यांची वाढ होऊ शकत नाही. भाजप आता खऱ्या अर्थाने विकासाच्या भूमिकेत काम करत आहे, असे मंत्री बावनकुळे म्हणाले.
ई-बॉन्ड प्रणाली हा एक ऐतिहासिक निर्णय
"ई-बॉन्ड निर्णयाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, राज्य सरकारने सुरू केलेल्या ई-बॉन्ड प्रणाली हा महाराष्ट्राच्या इतिहासातील ऐतिहासिक निर्णय आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मुद्रांक विभाग इलेक्ट्रॉनिक बॉन्ड लाँच करतो आहे. ई-प्रणालीमुळे आता स्टॅम्प पेपरची गरज भासणार नाही. हा आमच्या सरकारचा ऐतिहासिक निर्णय असून यामुळे नागरिकांना मोठी सुविधा उपलब्ध होईल", असेही बावनकुळे म्हणाले.