राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : एक विशाल संघटन (समग्र दर्शन)

    26-Oct-2025
Total Views |

टीकाकारांनी संघावर टीका करणारी इतकी पुस्तकं लिहिली; पण त्यातल्या कुणी हे संघटन सतत का वाढत राहिले? हे जाणून घेण्यासाठी, संघाच्या कार्यपद्धतींचा सर्वंकष अभ्यास केला का, हा प्रश्नच आहे. अशा पार्श्वभूमीवर संघाच्या कार्यपद्धतींबद्दल विस्ताराने ऊहापोह करणारे रामकृष्ण पटवर्धन लिखित पुस्तक म्हणजेच ‌‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक विशाल संघटन (समग्र दर्शन)‌’ रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने या पुस्तकाचा घेतलेला आढावा...

'समूह‌’ आणि ‌‘संघटन‌’ हे दोन्ही शब्द संख्यात्मक अनेकत्व दर्शवत असले, तरी त्या दोन्हींच्या अर्थामध्ये मूलभूत फरक आहे. सर्वांच्या एकत्र येण्यामागे काही सामायिक उद्देश असला, तरी प्रत्येक समूहाला संघटन म्हणता येत नाही. बसथांब्यावर उभे असलेले लोक किंवा एखादा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात आलेले लोक यांचा उद्देश एकच असला, तरी तो समूह म्हणजे संघटन नसते. मग दोन्हीमध्ये नेमका फरक कोणता? ‌‘एकजूट‌’ हा घटक समूह आणि संघटन यांच्यामधील सीमारेषा आखतो. जेव्हा कुठलाही समूह आपले अनेकत्व विसरून, आपल्यातली एकजूट प्रकट करून एखादे निश्चित ध्येय गाठायला निघतो, तेव्हा जे बनते त्याला ‌‘संघटन‌’ असे म्हटले जाते. एखाद्या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी दाखवलेली एकजूट हेही संघटनेचेच उदाहरण. अशी अनेक संघटने आपल्याला नित्यनेमाने दिसत असतात. पण, अशा संघटनांच्या भाऊगदत काही संघटने मात्र अगदी उठून दिसतात. कारण, त्यात समाविष्ट असलेल्या लोकांचा उद्देश वैयक्तिक प्राप्ती हा नसतो. व्यापक हितासाठी एकत्र येऊन ते समाजासाठी स्वतःचे सर्वस्व अर्पण करतात. परस्पर स्नेहभाव हा गुण त्यांना एकमेकांशी बांधून ठेवतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे एक असेच संघटन. तब्बल 100 वर्षे कुठलीही उभी फूट न पडता केवळ टिकलेलेच नाही, तर सतत वर्धिष्णू असणारे हे संघटन व्यवस्थापनशास्त्र आणि संघटनशास्त्र यांच्या अभ्यासकांनी आवर्जून अभ्यासावे, असेच आहे. टीकाकारांनी संघावर टीका करणारी इतकी पुस्तकं लिहिली; पण त्यातल्या कुणीही हे संघटन सतत का वाढत राहिले, हे जाणून घेण्यासाठी संघाच्या कार्यपद्धतीचा सर्वंकष अभ्यास केला का? हा प्रश्नच आहे. या पार्श्वभूमीवर संघाच्या कार्यपद्धतीबद्दल विस्ताराने ऊहापोह करणारे रामकृष्ण पटवर्धन लिखित ‌‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक विशाल संघटन (समग्र दर्शन) हे पुस्तक प्रकाशित झाले होते‌’

‌‘संघटन स्थापनेमागील विचार प्रभाव‌’‘संघटनेचे ध्येय आणि वाटचाल‌’, ‘संघटनेची निर्मिती‌’, ‌‘संघस्वयंसेवक‌’, ‌‘संघप्रचारक‌’,‌‘व्यवस्थापन कार्यपद्धती आणि विस्तार‌’,‘संघाच्या उपलब्धी‌’ आणि ‌‘हिंदू स्वयंसेवक संघ‌’ या प्रकरणांमध्ये हे पुस्तक विभागलेले असून, प्रत्येक प्रकरणात त्या त्या अनुषंगाने सविस्तर विवेचन केले गेले आहे.

संघस्थापना आणि संघवृद्धी

संघ टिकून राहण्यामागचे रहस्य जाणून घ्यायचे असेल, तर संघाचे स्वरूप जाणून घेणे आवश्यक ठरते आणि संघाचे स्वरूप जाणून घ्यायचे असेल, तर संघाच्या स्थापनेमागचा विचार आणि तत्कालीन पार्श्वभूमीही लक्षात घेणे गरजेचेच आहे. डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना करण्याआधी, वैचारिक तसेच कार्यशैलीतील भिन्नता असणाऱ्या अनेक चळवळींमध्ये भाग घेतला होता. यात सत्याग्रहापासून ते भूमिगत क्रांतिकार्यापर्यंतचे विविध मार्ग समाविष्ट आहेत. या गोष्टी जाणून घेतल्या, तर डॉक्टर संघस्थापनेच्या निर्णयापर्यंत का पोहोचले, हे जाणून घेणे सोपे जाते. त्या दृष्टीने पुस्तकातले ‌‘संघटन स्थापनेमागील विचार प्रभाव‌’ हे प्रकरण महत्त्वाचे आहे.

पुढच्या प्रकरणांमध्ये संघाच्या वाटचालीबरोबरच, संघाची कार्यपद्धती उलगडून सांगितली आहे. दैनंदिन शाखा व तिथे होणारे कार्यक्रम, अखिल भारतीयस्तरापासून ते शाखास्तरापर्यंत नियमितपणे होणाऱ्या बैठका, बैठकांच्या माध्यमातून होणारे सूक्ष्मातिसूक्ष्म नियोजन, संघटन श्रेणी आणि जाग्रण श्रेणींना नेमून दिलेल्या जबाबदाऱ्यांमुळे कामाला कशी गती मिळते, या गोष्टींचे यात विवेचन आहे. संघाची सेवाकार्ये, धर्मांतर रोखण्यासाठी केले जाणारे प्रयत्न हे संघाच्या व्याप्तीची कल्पना देतात. परस्परांमध्ये असलेला ‌‘विशुद्ध स्नेहभाव‌’ संघटन मजबूत करण्यात आणि चिरस्थायी होण्यात कसा महत्त्वाचा ठरतो, हेही आवर्जून या पुस्तकामध्ये सांगितले आहे. कारण, तेच तर संघाच्या वाढीचे खरे रहस्य आहे.

संघ स्वयंसेवक आणि संघ प्रचारक या दोहोंच्या खांद्यावरच संघाचा सगळा डोलारा उभा आहे. त्यामुळे या दोन्हींच्या वैशिष्ट्यांना विस्ताराने हात घालणारी स्वतंत्र प्रकरणे, या पुस्तकात समाविष्ट केली गेली आहेत. संघ प्रचारक या प्रकरणात संघाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय कष्टात दिवस कंठून, विरोध पत्करून संघटनेचे रोपटे रुजवणाऱ्या प्रमुख प्रचारकांचीही ओळख करून दिली आहे. वेश, भाषा, अन्न, वातावरण या सर्वच बाबतीत अपरिचित प्रदेशात जाऊन, कुठल्याही आर्थिक मोबदल्याशिवाय तेथे राहात संघकार्य वाढवत नेण्यासाठी केलेले भीमप्रयत्न पाहून अचंबित व्हायला होते. संघाचा चिवटपणा हा अशा प्रचारकांच्या निष्ठेपणातूनच आलेला आहे, हे यातून ध्यानात येतं.

संघाची व्यापकता

‌‘संघ नक्की करतो काय?‌’ असे कुतूहल असणाऱ्यांनी आणि ‌‘इतकी वर्षे तुमच्या संघाने काय केलं?‌’ असे कुत्सितपणे विचारणाऱ्या संघविरोधकांनी, पुस्तकातलं ‌‘संघाच्या उपलब्धी‌’ हे प्रकरण अवश्य वाचावे. राष्ट्रजीवनाच्या कोणकोणत्या अंगावर संघाचा प्रभाव पडला आहे, संघविचाराने चालणाऱ्या संघटना कोणत्या, त्यांचं कार्य खोलवर पोहोचवण्यासाठी कोणते कार्यक्रम हाती घेतले जातात, याचं विवेचन या प्रकरणात केलेलं आहे. संघाची देशभरच्या विविध प्रांतांमधल्या व्यापक शिबिरांची नोंद करतानाच, उपस्थितांची संख्या किती याबद्दलही पुस्तकात आलेख आणि तक्ते दिले आहेत. ते वाचून संघाचा विस्तार किती आहे आणि व अधिकाधिक कसा वाढत जातो आहे, हे सहज लक्षात येते. संघाच्या वाढीमध्ये त्यांचे योगदान किती महत्त्वाचे आहे आणि याद्वारे काय साध्य झाले, हेही मांडले आहे.

उदा. एका घोष शिबिरासाठी संघाच्या घोष पथकाव्यतिरिक्त, अन्य बॅण्डवाल्यांनाही बोलावले होते. त्यांच्याशी संपर्क आल्याने, त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचा अभ्यास झाला. गुजरातमध्ये एका शिबिरानिमित्ताने एकत्रीकरण करत असताना, वनवासी भागामध्ये डोके वर काढत असलेल्या फुटीरतावादी शक्तींची जाणीव झाली. एकदा समस्येचे स्वरूप लक्षात आले की, त्यावर संघाच्या माध्यमातून उपाययोजनाही केल्या जातातच. त्यामुळेच आज देशभरात दीड लाखांहून अधिक सेवाकार्य संघविचारांच्या माध्यमातून चालू आहेत.

अमूक एका प्रश्नावर संघाची भूमिका काय, याबद्दल अनेकदा गोंधळ निर्माण केला जातो. संघाच्या कार्यकारिणीची दरवष प्रदीर्घ बैठक होत असते. त्यामध्ये देशापुढच्या, समाजापुढच्या समस्यांचा सखोल ऊहापोह होऊन, त्यावर संघाची भूमिका स्पष्ट करणारा ठराव कार्यकारिणी मंजूर करते आणि तीच संघाची अधिकृत भूमिका असते. कार्यकारिणीत मंजूर झालेल्या अशा अनेक कालसुसंगत ठरावांचा या पुस्तकात आवर्जून केलेला समावेश, या पुस्तकाचे मूल्यवर्धन करतो. आसाम दंगल, बांगलादेशातील हत्याकांड, चीनसंबंधी अपेक्षित असलेले धोरण, भ्रष्टाचारावरचा अंकुश अशा वैविध्यपूर्ण विषयांवरचे ठराव संघाने पारित केले आहेत, हेही यानिमित्ताने वाचकांना कळते.

पुस्तकाच्या जमेच्या बाजूबद्दल लिहितानाच, पुस्तकात सुधारणेची गरज असणारी गोष्टही सांगायला हवी. संघाबद्दल विस्ताराने ऊहापोह करण्याच्या ओघात, यातली वाक्यरचना सुटसुटीत राहिली नाही. त्यामुळे काही ठिकाणी वाक्यरचनेच्या चुका झाल्या आहेत. पुढच्या आवृत्तीआधी, या पुस्तकाचे या अनुषंगाने पुनरावलोकन व्हावे.

नुकत्याच झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे, संघाबद्दलचे समाजातले कुतूहल अधिक वाढले आहे. एकूणच संघाचे विविध अंगांनी दर्शन घडवणारे, संघ टिकून राहण्याचे रहस्य उलगडून दाखवणारे, संघाच्या कार्यपद्धतीचे पदर उलगडून दाखवणारे हे पुस्तक संघाविषयी कुतूहल असणाऱ्यांनी अवश्य वाचावेच; पण संघटन पातळीवर अनेक वर्षे कच्चेच राहिलेल्या किंवा काळाच्या ओघात संघटनाची ताकद खिळखिळी झालेल्या आणि सदैव संघावर टीका करण्यात धन्यता मानणाऱ्या संघविरोधकांनीही अवश्य वाचावे, असेच आहे. न जाणो त्यांना या अभ्यासातून काही महत्त्वाची सूत्रं मिळतील आणि उभारीही मिळेल!

पुस्तक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक विशाल संघटन (समग्र दर्शन)
लेखक : रामकृष्ण पटवर्धन
प्रकाशक : मृदुल प्रकाशन
पृष्ठसंख्या : 360
मूल्य : 500 रुपये

- प्रसाद फाटक