मुंबई : मराठी आणि हिंदी सिनेविश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन झाले आहे. सतीश यांचे अगदी जवळचे मित्र अशोक पंडित यांनी त्यांच्या निधनाची बातमी सांगितली आहे. सतीश यांना गेले अनेक दिवस किडनीसंबधीत समस्या होत्या. तर किडनी निकामी झाल्यामुळे त्यांना दादरमधील हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले होते, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २:३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी यावर हळहळ व्यक्त केली आहे.
दरम्यान, सतीश शाह बऱ्याच काळापासून किडनीच्या संबंधित आजाराने ग्रस्त होते. तसेच त्यांची किडनी प्रत्यारोपण झाल्याचं बोललं जातं आहे. आणि त्यातूनच त्यांना इन्फेक्शन झाले होते. तर काहींच्या मते त्यांची किडनीच निकामी झाल्यामुळे त्यांचा त्रास वाढला आणि त्यांना दादरमधील हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
सतीश यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. ‘मैं हूं ना’, ‘कल हो ना हो’, ‘फना’, ‘ओम शांति ओम’, ‘हम आपके हैं कौन’ आणि ‘जाने भी दो’ यारों तसेच मराठीतील ‘गम्मत जम्मत’, ‘वाजवा रे वाजवा’ सारख्या सुपरहीट सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. याशिवाय अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्येही ते झळकले होते. त्यातीलच एक म्हणजे ‘साराभाई वर्सेस साराभाई’. वयाच्या ७४ व्या वर्षी शाह यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. चारच दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेते असरानी यांचं निधन झालं. त्यानंतर सतीश शाह यांनीही जगाचा निरोप घेतल्याने सिनेविश्वाला मोठा धक्का बसला आहे. सतीश शाह हे हरहुन्नरी अभिनेते होते. विनोदी टायमिंगसाठी ते प्रसिद्ध होते. अनेक दशके त्यांनी सिनेविश्वात काम केलं. त्यांनी २५० हून अधिक हिंदी आणि इतर भाषिक चित्रपटांत काम केलं होतं.
दरम्यान, सतीश शाह यांचा जन्म मुंबईतील एका गुजराती कुटुंबात झाला होता. त्यांनी सेंट झेवियर्समध्ये शिक्षण घेतल्यानंतर थेट नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातून अभिनयाचे धडे घेतले. सुरुवातीच्या काळात नाटकांमधून त्यांनी कामे केली. त्यानंतर ‘ये जो है जिंदगी’ या टीव्ही सीरिअलद्वारे त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले आणि पहिल्या प्रयत्नातच ते लोकप्रिय झाले. या सीरिअलमुळे त्यांना केवळ पैसा आणि प्रसिद्धी मिळाली नाही तर त्यांच्या आयुष्याला एक टर्निंग पॉइंट मिळाला. कॉमिक रोलमधील टायमिंगमुळे ते अधिकच लोकप्रिय ठरले. त्यांची साराभाई वर्सेस साराभाई ही मालिका प्रचंड गाजली. आजही त्यातील पात्र प्रेक्षकांच्या तितकीच लक्षात आहेत.