मुंबई : (Nikita Sawant Accident) मुंबईहून आपल्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी गावी आलेल्या एका युवतीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडली आहे. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तळवडे-आंब्रेड मार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात फोंडाघाट गांगोवाडी येथील निकिता दिलीप सावंत हिचा जागीच मृत्यू झाला असून तिचा भाऊ वैभव सावंत किरकोळ जखमी झाला आहे. मुंबईतील गोरेगाव पूर्व नागरी निवारा परिषद कॉलनीत ते राहत होते.
नेमकं काय घडलं?
रविवारी सकाळी आपल्या सख्ख्या भावासोबत मामाकडे पत्रिका देऊन आंब्रडहून फोंडाघाटकडे येत होते. कसवण तळवडे येथील तीव्र उतारावर समोरून येणाऱ्या एस.टी. बसला बाजू देताना दुचाकी रस्त्यालगतच्या खडीवर घसरली. त्यात दोघेही खाली पडले. निकीताच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघातानंतर एस.टी. बस चालक, वाहक आणि प्रवाशांनी तत्परता दाखवत दोघांनाही आंब्रड येथील डॉ. खटावकर यांच्या रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निकीताला मृत घोषित केले.
३ फेब्रुवारीला होणार होतं लग्न
येत्या ३ फेब्रुवारीला निकिताचं लग्न होणार होते, लग्नाचीच पत्रिका देण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच मुंबईवरून गावी गेली होती. तिच्या आजोळी कुलदेवतेच्या मंदिरात पत्रिका ठेवायला गेली होती. त्यानंतर आपल्या मामाकडे लग्नाची पत्रिका देण्यासाठी आपल्या सख्ख्या भावासोबत दुचाकीने गेली होती. परत येत असताना हा अपघात झाला. काळाने हा निर्दयी घाव घातल्याने लग्नाच्या तयारीत असलेल्या सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.