मध्य रेल्वेत महात्मा गांधी जयंतीचा उत्साह

02 Oct 2025 16:44:06

मुंबई : मध्य रेल्वेने गुरुवार, दि.२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत स्वच्छता पंधरवाडा-२०२५ अंतर्गत सुरू असलेल्या विशेष मोहीम ५.० अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. आयोजित कार्यक्रमांमध्ये वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि जनतेचा उत्साही सहभाग दिसून आला. या कार्यक्रमात महात्मा गांधींनी मांडलेल्या स्वच्छता आणि सामाजिक सौहार्द प्रतिबिंबित करण्यात आले.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी उपनगरीय कॉन्कोर्स येथे महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करून दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. उपनगरीय लॉबीमध्ये एक उत्साही रांगोळी महात्माजींच्या महानतेचे आणि त्यांच्या शिकवणींचे प्रतीक होती, जी सर्वांना त्यांचा परिसर स्वच्छ ठेवण्याची प्रेरणा देत होती.

यावेळी महाव्यवस्थापकांनी महात्मा गांधींच्या भित्तिचित्रांनी आणि स्वच्छता घोषणेने सजवलेल्या ईएमयू रॅकची पाहणी केली. त्यांनी ईएमयू रॅकच्या मोटरमनच्या केबिनलाही भेट दिली. तसेच, 'स्वच्छता ही सेवा' आणि 'स्वच्छोत्सव' या संदेशाने रंगवलेल्या इलेक्ट्रिक लोको आणि डिझेल लोकोचीही पाहणी केली. सांस्कृतिक अकादमी, परळ कार्यशाळेच्या कलाकारांनी "स्वच्छता ही सेवा है" या विषयावर सादर केलेल्या प्रेरणादायी नुक्कड नाटकाचे महाव्यवस्थापकांनी खूप कौतुक केले. यावेळी प्रवाशांना सहभाग वाढविण्यासाठी आणि स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठी स्वच्छता शपथपत्रांचे पत्रके देखील वाटण्यात आली.

विशेष मोहीम ५.० (२-३१ ऑक्टोबर २०२५) चा भाग म्हणून, मध्य रेल्वे स्वच्छता आणि ई-कचऱ्याची पद्धतशीर विल्हेवाट यावर लक्ष केंद्रित करणारे उपक्रम हाती घेईल. या मोहिमेत संपूर्ण स्वच्छता, सुधारित जागा व्यवस्थापन, कामाच्या ठिकाणांचे सौंदर्यीकरण, पर्यावरणपूरक उपक्रम, हरित पद्धती आणि नेटवर्कमधील डिजिटायझेशन यावरही भर दिला जाईल. सार्वजनिक सहभाग, स्थानकांवर नागरिकांच्या अभिप्रायाचा समावेश करणे आणि अनावश्यक साहित्य आणि भंगाराची विल्हेवाट लावून जास्तीत जास्त महसूल मिळवण्यावर विशेष लक्ष दिले जाईल, ज्यामुळे संपूर्ण रेल्वे मध्ये स्वच्छता आणि आधुनिक व्यवस्थापन मानके संस्थात्मक होतील.


Powered By Sangraha 9.0