मुंबई : ( Ashlesha Diwali Magazine ) प्रख्यात कवी, ज्येष्ठ लेखक अशोक बागवे यांच्या हस्ते ' आश्लेषा' या दिवाळी अंकाचे प्रकाशन पार पडले. गुरुवार दि. १६ ऑक्टोबर ठाण्याच्या गडकरी कट्ट्यावर पार पडले. यावेळी व्यासपीठावर अंकाचे संपादक अशोक तावडे, कार्यकारी संपादिका तपस्या नेवे, ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका मेघना साने, आणि मेजर डॉ.आश्लेषा तावडे केळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अशोक बागवे म्हणाले की "आश्लेषा चा हा अंक सर्वसमावेशक आहे. अंकातील प्रत्येक विभागाच्या नाविन्यपूर्ण शीर्षकापासूनच हा अंक स्वत:चे वेगळेपण सिद्ध करतो. नवीन विचार, नवे आशय आणि विषय दिवाळी अंकांच्या निमित्ताने चर्चेत येतात आणि लेखकांनाही ते यानिमित्ताने मांडता येतात.”
हेही वाचा : महापारेषणमध्ये स्वदेशी वस्तू व उत्पादनांचे प्रदर्शन
संपादक आणि प्रकाशक अशोक तावडे यांनी मराठी भाषा वृद्धिंगत होण्यासाठी भाषा अधिकाधिक वापरली गेली पाहिजे. त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा अंक ते दरवर्षी प्रकाशित करतात असे सांगितले. तर कार्यकारी संपादक तपस्या नेवे यांनी संपूर्ण अंकाचा आढावा घेताना अंकातील विषयांची निवड कशी केली, त्याची मांडणी, मुखपृष्ठ, लेखकांनी अंकासाठी दिलेले सहकार्य याबद्दल माहिती दिली.
हे वाचलत का : बालवीर नवरात्र उत्सव मंडळाची दिवाळी आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांसोबत
सदर अंकात लेखन करणाऱ्या उपस्थित लेखक कवींचा यथोचित सत्कार बागवे सरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या वेळी अचानक पाउस आला तरीही रसिकांची उत्तम उपस्थिती सोहळ्याला लाभली. व्यासपीठावर मान्यवरांच्या मौलिक विचार धनाच्या शब्द सरीमध्ये अवघे रसिक वाचक चिंब भिजून गेले. कार्यक्रमामध्ये आनंदी फाऊडेशन च्या संकेत स्थळाचे अनावरण करण्यात आले. आदित्य केळकर यांनी याविषयी त्यांचे कार्य आणि उपक्रम याविषयी माहिती दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन दूरदर्शनचे सुप्रसिद्ध वृत्त निवेदक अमेय रानडे यांनी केले. मेजर डॉ आश्लेषा केळकर यांनी मान्यवरांचे, उपस्थितांचे आभार मानले.