विद्यार्थ्यांची नियंत्रण रेषेवरील केरन येथील भारतीय सैन्याच्या युनिटला भेट

17 Oct 2025 16:35:07

Indian Army
 
कल्याण : ( Students visit Indian Army unit at Keran ) देशाच्या एकात्मतेला बळकटी देणाऱ्या तसेच नागरिक आणि भारतीय सैन्य ह्यांच्यातील नाते अधिक दृढ करणाऱ्या उपक्रमाचा भाग म्हणून असीम फाउंडेशनने केरन या रम्य व दुर्गम भागातील नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या राष्ट्रीय रायफल्स बटालियनला भेट देण्यासाठी तीन दिवसांचा शैक्षणिक आणि प्रेरणादायी दौरा आयोजित केला होता. ह्या दौऱ्यात महाराष्ट्रातील सात विद्यार्थी आणि असीम फाउंडेशनचा एक स्वयंसेवक सहभागी झाले होते.
 
या तीन दिवसांच्या दौऱ्यात विद्यार्थ्यांना देशातील सर्वात कठीण भौगोलिक परिस्थितीत कार्यरत असलेल्या सैनिकांच्या जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची अनोखी संधी मिळाली. त्यांनी जवानांशी संवाद साधला. त्यांचा दिनक्रम पाहिला आणि शिस्त, सहनशक्ती आणि राष्ट्रसेवेच्या निष्ठेचा जवळून परिचय करून घेतला.
 
या काळात सहभागींनी कंपनी ऑपरेटिंग बेसला लाईन ऑफ कंट्रोल ला भेट दिली, गस्त घालण्यामध्ये सहभाग घेतला, नवनवीन शस्त्रास्त्रे आणि उपकरणांची झलक पाहिली, तसेच नियंत्रित वातावरणात प्रत्यक्ष फायरिंगचा अनुभव घेतला. त्यांना लाईन ऑफ कंट्रोल पलीकडील शत्रूच्या चौक्याही दाखवण्यात आल्या, ज्यामुळे त्यांना सीमावर्ती भागातील सैनिकांची जागरूकता, सज्जता आणि आव्हानात्मक जबाबदाऱ्या समजून घेता आल्या. याशिवाय केरन व्हॅलीच्या नैसर्गिक सौंदर्याचा आणि तिच्या सामरिक महत्त्वाचा अनुभव घेताना त्यांनी या परिसराची ओळखही करून घेतली.
 
दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांनी फरकिया ब्रिगेडच्या मुख्यालयाला आणि वज्र डिव्हिजनच्या मुख्यालयाला भेट देऊन ब्रिगेड कमांडर तसेच कंपनी कमांडर यांच्याशी संवाद साधला. या भेटीत हिमालयातील उंचावरील सीमावर्ती भागातील कमांड आणि कंट्रोल यंत्रणा, नेतृत्व आणि ऑपरेशनल समन्वय याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.
 
या तरुण विद्यार्थ्यांची जिज्ञासा, शिस्त आणि उत्साह खरोखर कौतुकास्पद होता. अशा संवादांमुळे तरुण पिढीला सैनिकांच्या जीवनातील आव्हाने, गौरव आणि अभिमान लक्षात येतो आणि नागरिकांचे आणि सैन्याचे नाते अधिक घट्ट होते. या तरुणांच्या चेहऱ्यावर झळकलेला उत्साह म्हणजे भारताच्या उज्ज्वल भविष्याचे प्रतिबिंबच होते.
 
असीम फाउंडेशनच्या प्रवक्त्याने सांगितले, “हा उपक्रम तरुणांना प्रेरित करण्यासाठी आणि आपल्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचे धैर्य, शिस्त आणि निःस्वार्थ सेवाभावाशी त्यांना जोडण्यासाठी आयोजित केला होता. अशा अनुभवांमुळे तरुणांमध्ये देशाभिमान, जबाबदारीची जाणीव आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा निर्माण होते.”
 
एका विद्यार्थ्याने सांगितले, “सैनिकांना आणि कमांडर्सना भेटणे, त्यांच्या परिस्थितीत काम करणे आणि त्यांचे आयुष्य जवळून पाहणे हा आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव होता. मला आता ‘सेवा’ आणि ‘नेतृत्व’ यांचा खरा अर्थ समजला.”
दौऱ्यातील सर्व सहभागींनी असीम फाउंडेशन आणि भारतीय सैन्याचे, विशेषतः राष्ट्रीय रायफल्स बटालियनचे मनापासून आभार मानले. हा उपक्रम असीम फाउंडेशनच्या युवा सहभाग, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्र बांधणीशी बांधिलकीचा पुरावा असून, भारताच्या अतिदुर्गम सीमावर्ती भागात नागरिक–सेना यांच्या समन्वयाचा सुंदर संदेश देणारा ठरला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0