भारतीय संस्कृतीचा आनंदोत्सव म्हणजे दिवाळी. जीवनरुपी ज्योत तेवत ठेवणं म्हणजे दिवाळी! काळाच्या ओघात आपल्या राष्ट्राने अनेक स्थित्यंतरं अनुभवली. परंतु, त्याच्या मुळाशी असलेला हा वारसा मात्र खंडित झाला नाही. आधुनिक काळात सुद्धा याच्या मुळाशी असलेला धर्मविचार समाजामध्ये चिरंतर प्रवाहित राहिला. तिमिराला भेदणारा प्रकाशाचा एक दिवा, ज्ञानरुपी सत्वाचा विचार देत असतो. असे लक्षावधी दिवे ज्यावेळी एकत्र प्रकाशमान होतात, तेव्हा आपल्या संस्कृतीच्या वैभवरुपी वारशाचेच भव्य दर्शन आपल्याला घडून येते. मात्र, हे दिवे घडवण्याची प्रक्रिया सुद्धा तितकीच चिंतनशील आहे. इथे कौशल्य आणि सृजनाचा जेव्हा मेळ घट्ट बसतो, तेव्हा आकाराला येणारा दिवा हा केवळ एक वस्तू राहत नाही, तर निर्मितीचे ते एक नवीन शिल्पच असते. मुंबईच्या धारावी येथील कुंभारवाड्यात आकाराला येणारे हे दिवे म्हणजे प्रकाशपर्वाची नवीन पहाट. त्याचीच काही क्षणचित्रे...
दिवाळीला दरवर्षी धारावीच्या कुंभारवाड्यात माती तुडवण्यापासून ते दिव्यांच्या विक्रीपर्यंत संपूर्ण प्रक्रिया संथ गतीने सुरु असते. गजबजलेल्या मुंबईच्या पोटात एका आगळ्यावेगळ्या सृजनाची ओळख यावेळी होते. दैनंदिन व्यवहारासोबतच दिवाळीची लगबग सुरु असते.
‘फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार’ हे बापूजींच्या आवाजात आपण नेहमीच ऐकत असतो. त्याची ही कुंभारवाड्यातील दृश्य प्रचिती...
कुंभारवाड्यातील घड्यांसोबत आकाराला येणारे मातीचे दिवे, भट्टीतून तयार होत आपलं रुप पक्कं करतात.
दिव्यांची निर्मिती हे कुंभारवाड्यातील अनेक महिलांचे या काळातील उपजीविकेचे साधन. घड्यांसोबतच, मातीचे दिवे तयार करत रोजगाराला पाठबळ मिळते.
मातीचे दिवे घडवण्याची प्रक्रिया ही समूहाची प्रक्रिया आहे. कारागिरांच्या हातून दरसाल अशा हजारो दिव्यांची निर्मिती होते. या प्रक्रियेमध्ये तहान-भूक विसरुन, हे कारागीर निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये रममाण होतात.
हजारो दिव्यांची निर्मिती ज्या कुंभारवाड्यामध्ये होते, तिथून देशभरामध्ये या दिव्यांचा प्रवास सुरु होतो. मुंबईच्या एका वस्तीमध्ये तयार होणारे हे दिवे, देशाचा कानाकोपरा उजळून काढतात.
अखेर तयार झालेले हे दिवे, आपल्या प्रवासाच्या नव्या पर्वासाठी सज्ज होतात.
- संकलन : मुकुल आव्हाड, छाया : अजिंक्य सावंत