नवी दिल्ली : बायकोच्या आणि सासरच्या माणसांना कंटाळून अतुल सुभाष या तरूण अभियांत्याने आत्महत्या केली. आपल्या आत्महत्येचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांनी दीड तासाची व्हिडीओ तयार केली आणि या व्यतिरीक्त मृत्यूपत्र सुद्धा लिहीले. घटस्फोट झाल्यानंतर अतुल सुभाष यांचा मुलगा, त्यांची पत्नी निकीता सिंघानिया यांच्यासोबत राहत होता.यानंतर आता सर्वोच्च न्यायलयाने अतुल सुभाष यांच्या मुलाचा ताबा, अतुल सुभाष यांच्या आईला देण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
सर्वोच्च न्यायलयाने म्हटले आहे की, निकिता सिंघानिया यांना आपल्या मुलाला आपल्याजवळ ठेवण्याचा अधिकार आहे. त्या मुलाला त्याच्या आजी आजोबांकडे (अतुल सुभाष) सोपवणे योग्य ठरणार नाही कारण, तो त्यांना ओळखत देखील नाही. कोर्टात न्यायमूर्ती नागरथना यांनी अतुल सुभाष यांच्या आईला निकिता सिंघानियाविरोधात बोलल्याबद्दल ताकीदही दिली. निकिता सिंघानिया यांना दोषी म्हणू नये, कारण आजपर्यंत त्यांचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झालेला नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
एखाद्याला दोषी ठरवण्याचा अधिकार फक्त न्यायालयाला असून इथे ही मीडिया ट्रायल नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. जर अतुलच्या आईला तिच्या नातवाचा ताबा हवा असेल तर ती यासाठी दुसरी कायदेशीर प्रक्रिया अवलंबू शकते, असा सल्ला न्यायालयाने दिला आहे.