मुंबई महानगर क्षेत्रात 'केबल कार' प्रकल्प राबवणार!

मंत्री प्रताप सरनाईक घेणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

    06-Jan-2025
Total Views |
 
Pratap Sarnaik
  
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात 'केबल कार' प्रकल्प राबविण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत. येत्या ७ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे 'विकसित भारत २०४७' या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या लक्षप्राप्तीच्या दृष्टीने नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक होणार आहे.
 
या बैठकीला मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित राहणार आहेत. दरम्यान मंत्री नितीन गडकरी यांची विशेष भेट घेऊन मुंबई महानगर क्षेत्रामध्ये 'केबल कार' प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र सरकारद्वारे 'पर्वतमाला परियोजना' अंतर्गत सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) अथवा केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त आर्थिक भागिदारीने रोप वे विकसित करण्याचा मानस व्यक्त केला जाणार आहे.
 
हे वाचलंत का? -  ‘मातोश्री टू‘ बांधणाऱ्या उद्धव ठाकरेंना पंतप्रधान मोदींचा साधेपणा दिसणार नाही!
 
मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पालघरपासून रायगड जिल्ह्यातील उरण-पेणपर्यंत पसरलेल्या एकूण क्षेत्रामध्ये नागरिकीकरणाचा वेग वाढत आहे. रस्ते वाहतूक, रेल्वे, मेट्रो यासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवेवर दिवसेंदिवस पडणारा ताण लक्षात घेता भविष्यात केबल कारसारखी हवाई सेवा विकसित होणे आवश्यक आहे. त्यासाठी या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा (DPR) तयार करणे गरजेचे असून त्याला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी विशेष परवानगी देणे आवश्यक आहे. या भेटीदरम्यान मंत्री गडकरी यांना या प्रकल्पाचे सादरीकरण करुन मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व विशद केले जाईल, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
 
मुंबई महानगर क्षेत्रातील वाढते नागरीकरण, वाहनांची वाढती संख्या, त्या तुलनेत अपुरी रस्ते व रेल्वेसेवा, वाढते प्रदूषण या कारणामुळे काही धोरणात्मक निर्णय घेऊन आधुनिक तंत्रज्ञान व पाश्चात देशातील यशस्वी झालेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास करून वाहतूक समस्या सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. मुंबई महानगरास प्राप्त झालेले महत्त्वपूर्ण भौगोलिक स्थान, सागरी किनारा खाडीचा प्रदेश, एलिफंटासारखी प्राचीन लेणी, माथेरान सारखे थंड हवेचे पर्यटन स्थळ, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य यासारखी हरित चादर जतन करून मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी रोप वेच्या माध्यमातून केबल कार प्रकल्प राबवणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पाचे महत्त्व केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, नितीन गडकरी यांना पटवून देऊन या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा तयार करण्याची तत्वतः मान्यता घेण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.