नियोजन प्राधिकरणांचे काम आता कंपनीच्या धर्तीवर

    05-Jan-2025
Total Views |
Devendra Fadanvis

मुंबई : “राज्यातील विविध नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करुन, त्यांचे कामकाज कंपनीच्या धर्तीवर करावे,” अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Fadanvis ) यांनी शनिवार, दि. ४ जानेवारी रोजी दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी नगरविकास विभागाच्या आगामी १०० दिवसांच्या कामकाज नियोजनाबाबत बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री पंकज भोयर आदी उपस्थित होते.

नगरविकास विभाग(एक)चे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता यांनी विभागाचे सादरीकरण केले. त्यांनी सादरीकरणातून नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेले विविध नियोजन प्राधिकरण यांचे सक्षमीकरण करणे, शहरांजवळील सुमारे साडेतीन हजार गावांत रस्ते विकासाचे नियोजन करणे, राज्यातील दहा लाखांवरील शहरांत ‘नागरी संकल्प प्रकल्प’ राबविणे, इमारत परवाने देण्याच्या प्रक्रियेचे संगणकीकरण करणे, पर्यटन धोरणानुसार एकत्रित नागरी विकास आणि नियंत्रण नियमावलीत बदल करण्याबाबतची माहिती दिली.

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, राज्यातील शहरांच्या विकासासाठी निधी खर्च करण्याची आवश्यकता आहे. शहरातील पायाभूत विकासासाठी भांडवली गुंतवणूक करावीच लागणार आहे. मात्र, यासाठी निधी उभारण्यासाठी नाविन्यपूर्ण आर्थिक पर्याय उभारले पाहिजेत, अशा सूचना दिल्या. सोलापूर स्मार्ट सिटीच्या ‘पाणीपुरवठा योजने’च्या निधीसाठीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात यावी. यामुळे सोलापूरवासीयांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल, असे सांगितले.

सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांना सवलत मिळणार

राज्यातील प्रत्येक शहरात चित्रपटांसाठीची थिएटरची संख्या वाढण्याची गरज आहे. यासाठी सध्या असलेल्या सिंगल स्क्रीन थिएटरना काही सवलती देता येईल का, तसेच मराठी नाटक आणि चित्रपट एकाच थिएटरमध्ये दाखवता येईल का याबाबत विचार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.