मुंबई : एसटीमध्ये प्रवाशी आणि वाहकामध्ये सुट्ट्या पैशांवरून होणाऱ्या वादावर परिवहन विभागाने तोडगा काढला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचे आवाहन केले आहे.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांच्या तक्रारी आणि वाहकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेतली. सुट्ट्या पैशावरून वाहक आणि प्रवाशांच्यामध्ये वाद होऊ नये यासाठी एसटीने प्रवाशांना यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचे आवाहन केले आहे. याला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून मागील काही दिवसांपासून युपीआय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले असल्याची माहिती पुढे आली आहे.
तसेच वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रधन रकमेमध्ये १०० रुपयापर्यंत सुट्टे पैसे देण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला एसटी महामंडळाकडून देण्यात आले आहेत. यासोबतच महामंळाने युपीआय पेमेंट वाढविण्यासाठी प्रयत्न केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये युपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून युपीआय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे. तसेच भविष्यात वाहक आणि प्रवासी यांच्यात सुट्ट्या पैशावरून वाद उद्भभवणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत.