लखनऊ (Maha kumbh 2025) : अदानी समूहाचे सर्वेसर्वा उद्योगपती गौतम अदानी यांनी बुधवारी २९ जानेवारी रोजी महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीसंबंधित दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. शोकग्रस्त कुटुंबांचे त्यांनी सांत्वन केले आहे. तसेच मृतांना आणि बाधितांना मदत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यांनी सोशल मीडियावरील X ट्विटरवर पोस्ट शेअर करत घडलेल्या घटनेवर शोक व्यक्त केला. त्यांनी आश्वासन दिले की सरकारच्या माध्यमातून पीडितांना मदत केली जाईल असे त्यांनी नमूद केले होते.
त्यांनी लिहिले की, "महाकुंभामध्ये झालेल्या या दुर्घटनेमुळे आम्हाला दुःख झाले आहे. आम्ही मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहतो. शोकग्रस्तांच्या कुटुंबीयांना आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो," असे ट्विट गौतम अदानी यांनी केले.
पुढे त्यांनी लिहिले की, "महाकुंभात उपस्थित असलेल्या अदानी कुटुंबातील सर्व सदस्य आणि संपूर्ण अदानी समूह, न्याय प्रशासन आणि राज्य सरकारच्या सहकार्याने, बाधित असलेल्यांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर आहेत, असे ट्विट करत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.
मंगळवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास मौनी अमावस्येच्या शुभ प्रसंगी शाही स्नानासाठी भाविकांचा महापूर लोटला होता. यावेळी लाखो लोक गंगा आणि यमुना नद्यांच्या संगमावर एकत्र जमले होते. त्यावेळी ही घटना घडली होती.