'रोजगार हमी'च्या माध्यमातून ग्रामीण विकासाचा नवा आदर्श निर्माण करणार : भरत गोगावले
मंत्रालयात स्वीकारला पदभार
03-Jan-2025
Total Views |
मुंबई : रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात ग्रामीण विकासाचा एक नवा आदर्श तयार करण्यासाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले ( Bharat Gogavle ) यांनी शुक्रवार, दि. ३ जानेवारी रोजी केले.
मंत्रालयात रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते. गोगावले म्हणाले की, रोजगार हमी कामांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील गावांमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. तोच पॅटर्न राज्यात राबवून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात, विशेषतः ग्रामीण भागात ‘रोजगार हमी’ मुळे बदल होत आहेत. या बदलांची गती वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.