‘अखंड भारत व्यासपीठ’ हे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने विविध समाजाभिमुख कार्यक्रमांचे या वर्षभरामध्ये आयोजन करण्यात येणार आहे. या व्यासपीठाचा अध्यक्ष म्हणून येणार्या कालावधीमध्ये आयोजित उपक्रमांचा मागोवा घेणारा हा लेख...
भारतामध्ये आपण सर्वजण दि. १५ ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा करतो. हा दिवस एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो आणि ते योग्य पण आहे. परंतु, दि. १५ ऑगस्ट रोजीच्या आदल्या दिवशी म्हणजेच, दि. १४ ऑगस्ट रोजी देशाची फाळणी झाली. ही फाळणी समाजाच्या जिव्हारी लागली. या विभाजन तथा फाळणी दिनाची खंत, शल्य, सल, बोच आणि दुःखद किनार सतत समाज मनात आहे. ही ज्योत समाज मनामध्ये सतत तेवत राहावी, याच उद्देशाने ‘अखंड भारत व्यासपीठा’ची निर्मिती झाली. प्राथमिक स्वरूपात ‘अखंड भारत व्यासपीठा’ची मुहूर्तमेढ १९८५ साली एक छोटा आणि साधा उपक्रम म्हणून झाली. परंतु, पुढे या व्यासपीठाची दृष्टी आणि उद्देश व्यापक होत गेला आणि त्याला अनुसरून-ध्येय धोरणे विकसित केली गेली. साधारणतः १९९९ रोजी मूर्तस्वरूपात ‘अखंड भारत व्यासपीठा’ची गुढी रोवली गेली. आज याला २५ वर्षे पूर्ण होत आहेत आणि लवकरच हे व्यासपीठ रौप्य महोत्सवी वर्ष आणि त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे.
सुरुवातीच्या काळात दरवर्षी ‘अखंड भारत’ या विषयाला अनुसरून एक व्याख्यान व्हावे असा आणि एवढाच उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून सतत १९ ते २० वर्षे ही व्याख्यानमाला सुरू राहिली. या व्याख्यानमालेत नानाराव ढोबळे, शिवराय तेलंग, सु. ग. शेवडे, ब. ना. जोग, सुरेशराव केतकर, दादा इदाते, वसंतराव केळकर, डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी, सुरेंद्र थत्ते, प्रल्हादजी अभ्यंकर, दुर्गानंद नाडकर्णी, डॉ. अशोकराव मोडक, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, मुझ्झफर हुसेन, सुहासराव हिरेमठ, अरुण करमरकर, शरदराव हेबाळकर, सुदर्शनजी आणि आचार्य धर्मेंद्रजी अशा महनीय व्यक्तींनी आपले विचार मांडले आहेत. व्यासपीठाचे कार्य आणि एकूणच ध्यास बघून आचार्य धर्मेंद्रजींनी या संस्थेचे नाव ‘अखंड भारत व्यासपीठ’ असेच असेल, असे त्यांच्या व्याख्यानात घोषितच केले. या व्यासपीठाचे प्रथम अध्यक्ष म्हणून स्वर्गीय मुझ्झफर हुसेन यांनी जबाबदारी स्वीकारली. पुढील काळात म्हणजेच साधारणतः २००४ सालापासून दरवर्षी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि सार्वजनिक संस्थांमध्ये झेंडावंदन होत असते. अशा कार्यक्रमांमध्ये वक्ता म्हणून ‘अखंड भारत व्यासपीठा’चे कार्यकर्ते जाऊ लागले. २०१० सालापासून दरवर्षी या विषयाला अनुसरून एकदिवसीय अभ्यासवर्ग घेण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत सातत्याने हा एकदिवसीय अभ्यासवर्ग होत आहे. अभ्यास वर्गामध्ये आतापर्यंत डॉ. सच्चिदानंद शेवडे, शेषाद्री चारी, दिलीप करंबेळकर, जनरल शेकटकर, शरदभाऊ जोशी, रमेश पतंगे, मल्हार गोखले, रतन शारदा, इंद्रेश कुमारजी, पांडुरंग बलकवडे, डॉ. सतीश मोढ आदींनी आपले विचार मांडले आहेत. याव्यतिरिक्त या व्यासपीठाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी ‘अखंड भारत प्रदर्शनी’, ‘अखंड भारत ज्योत’, ‘अखंड भारत’ या विषयावरील पुस्तक प्रकाशन, ‘अखंड भारत संमेलन’, ‘अखंड भारत शोभायात्रा’ अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन सातत्याने करण्यात आले. ’सांस्कृतिक भारत’ या त्रैमासिकाचे नियोजन आणि दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन हे गेले काही वर्षे नियमितपणे सुरू आहे.
भविष्यातील वाटचाल
‘अखंड भारत’ ही फक्त एक संकल्पना नसून भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक अखंडता हा त्या मागचा मूलभूत गाभा आहे आणि ‘अखंड भारत व्यासपीठ’ याच ध्यासाने सातत्यपूर्वक काम करत आहे आणि या पुढेही करत राहील. या पुढील काळात वैचारिक लढाई ही विक्राळ रूप घेणार आहे. या वैचारिक लढाईत चोख आणि सत्याची कास धरून, परखड मत व्यक्त करणे, योग्य बाजू समाजासमोर मांडणे, समाजमनात राष्ट्रीय महत्त्वाचे विषय पोहोचवणे हे आणि असे विविध प्रकारचे मोलाचे योगदान ‘अखंड भारत’ व्यासपीठ पार पडणार आहे. राष्ट्रहिताचे सर्व विषय अत्यंत प्राथमिकतेने घेऊन ‘अखंड भारत व्यासपीठ’ त्यावर काम करणार आहे.हे वर्ष ज्याप्रमाणे ‘अखंड भारत व्यासपीठा’चे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे, त्याचप्रमाणे भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्षसुद्धा आहे. हा दुर्मीळ योग साधून ‘अखंड भारत व्यासपीठ’ या वर्षभरात विविध अशा समाजाभिमुख कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.
त्यातील काही महत्त्वाचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे असतील. संविधानाचा मसुदा ज्या थोर आणि महान विभूतींनी बनवला, त्यांच्या जन्मस्थानी आणि कर्मस्थानी संविधान यात्रा काढण्यात येईल. ‘संविधानाचे खरे मारेकरी कोण?’ या विषयावर महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थानांवर चर्चासत्र आणि कार्यक्रम घेण्यात येतील.संविधान वाचनाचे सामूहिक संमेलन आणि सप्ताह घेण्यात येतील. विविध प्रकारचे जिहाद या विषयी जागरण सीएए, एनआरसी, युसीसी आदीसंबंधी जागरण आणि त्यासाठी आवश्यक अशा प्रकारची चर्चासत्रे आदी कार्यक्रम घेण्यात येतील. स्वर्गीय मुझ्झफर हुसेन यांच्या स्मरणार्थ एक व्याख्यानमाला आयोजित करण्यात येणार आहे. ज्यामध्ये अनेक मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. अशा प्रकारच्या राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयावर कार्य करण्यामध्ये ‘अखंड भारत व्यासपीठ‘ हे नेहमीच अग्रणी आणि तत्पर राहील. अशा प्रकारचे विविध कार्यक्रम लवकरच आणि विविध ठिकाणी आयोजित करण्यात येतील. सर्व समाजाने यामध्ये तन, मन, धन या उक्तीप्रमाणे सहभागी व्हावे, असे आवाहन ‘अखंड भारत व्यासपीठा’चे अध्यक्ष म्हणून मी भारतीय प्रजासत्ताकदिनी समस्त हिंदू समाजाला केले आहे.
संजय ढवळीकर
९८३३०७६३३३