माधवी बुच यांची सेबीच्या अध्यक्षपदाची कारकीर्द अदानी समुहाशी जवळीक असल्याच्या आरोपांनी गाजली होती. अमेरिकेतील वादग्रस्त संशोधन संस्था हिंडेनबुर्ग रिसर्च संस्थेकडून माधवी यांनी अदानी समुहावर मेहेरनजर दाखवल्याचा आरोप केला होता. अदानी समुहाला पतपुरवठा करणाऱ्या एका परदेशी संस्थेत माधवी यांची गुंतवणुक असून त्यातून फायद्यासाठी अदानी समुहाला मेहेरनजर दाखवत शेअर बाजारात तसेच करचुकवेगिरीचे मार्ग अवलंबल्याचा आरोप हिंडेनबुर्गच्या अहवालात करण्यात आला होता. अदानी समुह आणि माधवी बुच दोघांनीही हे आरोप फेटाळून लावले होते.
अदानी समुहाच्या वादांबरोबरच माधवी यांच्यावर कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या पिळवणुकीचेही आरोप करण्यात आले होते. या बद्दल माधवी यांना लेखी स्पष्टीकरण द्यावे लागले होते. एवढ्या सर्व वादंगांमध्येही माधवी यांच्या कारकीर्दीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले गेले. परदेशी गुंतवणुकदारांना गुंतवणुकीची मर्यादा वाढवणे, म्युच्युअल फंड्स सारख्या संस्थांना व्यवसाय सुलभीकरण करणे यांसारखे महत्वाचे निर्णय माधवी यांच्या कारकीर्दीत घेतले गेले.
भारतातील शेअर बाजार आणि त्यांतील व्यवहारांवर नियंत्रण ठेवणारी शीर्षस्थ संस्था म्हणून सेबी काम करते. १९९२ साली शेअर बाजारात झालेल्या हर्षद मेहता घोटाळ्यानंतर शेअर बाजारातील व्यवहारांचे नियंत्रण करण्यासाठी आणि गुंतवणुक दारांचे हीत जपण्यासाठी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडीया म्हणजे सेबीची स्थापना करण्यात आली होती.