बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी वाघिणीचा मृतदेह आढळून आला. सिंदेवाही-आलेवाही दरम्यानच्या रेल्वे मार्गिकेवरुन सकाळी ६.४४ रोजी सिकंदराबादकडे एक प्रवासी रेल्वे जात होती. त्यावेळी रुळ ओलांडणाऱ्या वाघिणीला रेल्वेची जबर धडक बसली. या धडकेत वाघिणीचा जागीच मृत्यू झाला. यावेळी रेल्वेचा वेग हा १०० किमी प्रति तास असल्याची माहिती रेल्वे मास्तर यांनी 'हॅबिटॅट काॅन्झर्वेशन सोसायटी'चे अध्यक्ष दिनेश खाटे यांना दिली. या मार्गिकेवर वन्यजीवांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षभरात या मार्गिकेवरील अजुर्नी मोरगाव, नागभीड आणि रविवारची सिंदेवाही येथील घटना धरुन तीन वाघांना रेल्वेने चिरडले आहे. हा रेल्वे मार्ग दक्षिणेला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि कान्हळगाव वन्यजीव अभयारण्य यांना जोडणाऱ्या व्याघ्र भ्रमणमार्गाला छेदून जातो, तर उत्तरेला ब्रम्हपुरी जोडणाऱ्या भ्रमणार्गाला छेदतो. त्यामुळे याच भागात वन्यजीवांना रेल्वेच्या धडकेत आपला जीव गमवावा लागतो.
याच मार्गिकेवर मध्यप्रदेशमधील बालाघाट - नैनपुरदरम्यान वन्यजीवांच्या सुखकर हालचालींसाठी १० अंडरपास आणि दोन ओव्हरपास बांधण्यात आले आहेत. म्हणजेच काही ठिकाणी रेल्वे मार्ग उन्नत स्वरुपात बांधण्यात आला आहे, तर काही ठिकाणी रेल्वे मार्गावरुन वन्यजीवांसाठी उन्नत पूल उभारण्यात आला आहे. या अंडरपास आणि ओव्हरपासमधून २३ प्रजातींचे वन्यजीव ये-जा करत असल्याची नोंद 'वाईल्डलाईफ काॅन्झर्वेशन ट्रस्ट'ने केली आहे. यामध्ये वाघ आणि बिबट्याचा देखील समावेश आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही उपाययोजना या बल्लारशाह गोंदिया रेल्वे मार्गावर करण्यात आलेल्या नाहीत.
वेगावर मर्यादा महत्त्वाची
२०१८ साली बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्गावर वाघाच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्यानंतर वन विभाग आणि रेल्वे प्रशासन यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीनंतर वनक्षेत्रामधून जाणाऱ्या रेल्वेचा वेग ४० किमी प्रति तास करण्यात आला. मात्र, याची अंमलबजावणी फार काळ झाली नाही. सध्या या मार्गावरुन १०० तास प्रति किमी याच वेगाने रेल्वे धावते. त्यामुळे गव्यासारख्या मोठ्या प्राण्याचा देखील रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्यू होतो. - दिनेश खाटे, अध्यक्ष - हॅबिटॅट कॉन्झर्वेशन सोसायटी