मुंबई : (Forts Encroachments) महाराष्ट्रातील गडप्रेमींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. ३१मे पर्यंत राज्यातील सर्व गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवली जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आक्रमक पवित्रा घेत याबाबतचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, अतिक्रमणे हटवण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. ३१ जानेवारी २०२५ पर्यंत स्थापन केलेल्या समितीकडून सरकारने अतिक्रमणाबाबत किल्लानिहाय यादी मागवली असून त्यानंतर ३१ मे २०२५ पर्यंत सर्व गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे कालबद्ध पद्धतीने हटविण्यात येणार आहेत .तसेच पुन्हा नव्याने अतिक्रमण होऊ नये म्हणून दक्षता समितीची स्थापना करण्याची सूचना देण्यात आल्या आहे.
राज्यात केंद्रसंरक्षित ४७ किल्ले आणि राज्यसंरक्षित ६२ किल्ले आहेत. या किल्ल्यांच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता लवकरच महाराष्ट्रातील सर्व गडकिल्ले अतिक्रमणमुक्त झालेले पाहायला मिळणार आहेत.