नवी दिल्ली : भारतीय कॉफीप्रेमींसाठी एक अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. भारतीय कॉफीचे चाहत्यांची संख्या जगभरात सातत्याने वाढत आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी याबद्दलचा अहवाल समोर आला आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ या काळात कॉफीची निर्यात तब्बल १ बिलीयन डॉलर्सवर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २९ टक्क्यांची विक्रमी वाढ झाली आहे.
प्रामुख्याने रॉबस्ट कॉफीच्या किंमतींत झालेली वाढ आणि युरोपीय देशांकडून वाढती मागणी हे या विक्रमी निर्यातीमागचे प्रमुख घटक राहिले आहेत. युरोपात येऊ घातलेल्या नवीन जंगलनियमांमुळे भारतातील शेतमालाच्या तसेच कॉफी सारख्या पदार्थांच्या मागणीत लक्षणीय वाढ होऊ शकते. रॉबस्ट कॉफीचे दर या एका वर्षातच तब्बल ६३ टक्क्यांनी वाढली आहे. या कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने व्हिएतनाम आणि ब्राझील या देशांमध्ये होते. त्यामुळे त्या देशांतील कॉफी उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसत असून नेमकी हीच स्थिती भारतीय शेतकऱ्यांना अनुकूल ठरत आहे.
जागतिक तापमानवाढीचा फटका कॉफी उत्पादनास बसत आहे. त्यामुळे ब्राझील, व्हिएतनाम या देशांतील कॉफी उत्पादनास बसतोय. तरीही भारतातील केरळ, तामीळनाडू, कर्नाटक या प्रमुख कॉफी उत्पादक राज्यांतील शेतकऱ्यांनी मात्र याकाळातही आपली उत्पादन क्षमता टिकवून ठेवली. याचा मोठा लाभ भारतीय कॉफी निर्यातीला होतो आहे.
असे असले तरी युरोपीय देशांकडून आणले जाणारे नवे जंगलतोडी विषयीचे नवीन कायदे भारतीय कॉफी निर्यात वाढीला बाधा आणू शकतात. त्यामुळे त्यानियमांना अनुसरुन आपल्याला पावले उचलावी लागतील असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.