शेअर बाजाराची दमदार उसळी, २२४ अंशांची समाधानकारक वाढ

15 Jan 2025 19:44:47

 

 
share
 
 
 
मुंबई : काही दिवसांपासून सातत्याने चढ – उतारांचा सामना करणाऱ्या भारतीय शेअर बाजाराने सलग दुसऱ्या दिवशीही वाढच नोंदवली आहे. बुधवारी सेन्सेक्स मध्ये २२४ अंशांची दमदार वाढ झाली आहे. या समाधानकारक वाटचालीनंतर शेअर बाजाराने ७६,७२४ अंशांवर थांबला. देशातील सर्वात मोठ्या ५० उद्योगसमुहांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या निफ्टी मध्येही ३७ अंशांची वाढ होत, २३,२१३ अंशांवर थांबला. जागतिक बाजारातील धोके अजूनही पूर्णपणे निवळले नसले तरी भारतीय बाजाराने दाखवलेली उसळी हे सुखद चिन्ह आहे अशीच भावना सर्वच क्षेत्रातून उमटत आहे.
 

प्रामुख्याने पतपुरवठा करणाऱ्या संस्थांच्या शेअर्स मध्ये चांगलीच वाढ दिसून आली. बजाज फिनसर्व्ह, ऍक्सिस बँक, श्रीराम फायनान्स, कोटक महिंद्रा बँक या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. खरेदीदारांकडून दाखवल्या गेलेल्या उत्साहामागे येऊ घातलेल्या भारतीय अर्थसंकल्पाकडून असलेल्या अपेक्षा आहेत असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

अमेरिकेने रशियावर नुकतेच नव्याने घातलेले निर्बंध, त्यातच नव्या ट्रम्प सरकारने चीनवरही निर्बंध घालण्याचे संकेत दिले आहेत. तरी भारतीय बाजारातील उतरलेला किरकोळ महागाई दर यांचा बाजारपेठेला दिलासा मिळाला आहे. येऊ घातलेल्या भारतीय अर्थसंकल्पातून वाढीव करवजावट यांसारख्या दिलासादायक गोष्टींची अपेक्षा आहे. असे थोडे दिलासादायक वातावरण असले तरी वाढते खनिज तेलाचे दर हेही अर्थव्यवस्थेसमोर आव्हान निर्माण करू शकतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

  
 
 
 
Powered By Sangraha 9.0