मुंबई : बीड सरपंच हत्या प्रकरणातील दोषींना अजिबात थारा दिला जाणार नसून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर मंगळवार, १४ जानेवारी रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासूनच कुणीही दोषी असले तरी हयगय न करता त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, असे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ठरवले होते. या घटनेला महिना होऊन गेला. त्यांचे कुटुंबिय चिंतेत आहे. पोलिस यंत्रणा पोलिसांचे काम करत आहे. सीआयडी आणि एसआयटीदेखील चौकशी करत आहे. जो कुणी दोषी असेल त्याला अजिबात थारा द्यायचा नाही. ही निर्घृण हत्या आहे. शिवशाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कुणीही खपवून घेणार नाही. त्यामुळे कुणीही दोषी असेल आणि चौकशीत त्यांचे धागेदोरे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. ही घटना निर्घृण आणि माणूसकीला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे यामध्ये सत्ताधारी पक्षाचा असो, विरोधी पक्षाचा असो किंवा कुणी त्रयस्थ असो, यातील कुणालाही थारा दिला जाणार नाही," असे त्यांनी सांगितले.
हे वाचलंत का? - भगव्या झेंड्याखाली आणि तिरंग्याखाली एकत्रित येणे ही काळाची गरज!
बीडमध्ये सक्षम पोलीस अधीक्षक पाठवले!
वाल्मिक कराड समर्थकांनी परळीमध्ये पुकारलेल्या बंदबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "बीडमध्ये अतिशय चांगले सक्षम पोलीस अधीक्षक पाठवले आहे. कुठलाही राजकीय हस्तक्षेप न होऊ देता नीटपणे कायदा-सुव्यवस्था राखण्याचे अधिकार त्यांना दिलेले आहेत."