मोठा अनर्थ टळला! झाडामुळे मिळाले ४१ प्रवाश्यांना जीवनदान

13 Jan 2025 15:12:33

ratnagiri
 
रत्नागिरी : (Ratnagiri Bus Accident) दाभोळवरुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसचा रविवार, दि. १२ जानेवारीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रत्नागिरीच्या शेनाळे घाटातील चिंचाळी धरणाजवळील एका वळणानजीक असलेल्या दरीत ही बस कोसळली. झाडाझुडपांमधून खाली घरंगळत जाताना बस त्याठिकाणी असणाऱ्या एका झाडाला धडकून तिथेच अडकून पडल्याने जागेवर थांबली. जर ही बस पूर्णपणे दरीत कोसळली असती तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र, दैव बलवत्तर असल्याने प्रवाशांचे जीव वाचले.
 
प्राथमिक माहितीनुसार, एसटी बस रविवारी रात्री मंडणगड शेनाळे घाटातून मुंबईच्या दिशेने निघाली होती. या घाटात अतितीव्र उताराचा रस्ता असल्याने एका उतारावर एसटी बसवरील नियंत्रण सुटून ती दरीत कोसळली, दरीतील झाडाझुडपांमधून ही एसटी बस खाली घरंगळत जात होती. या दरीच्या खालच्या बाजूला धरण होते. ही एसटी बस आणखी खाली घरंगळत गेली असती तर थेट धरणात कोसळली असती आणि अनेक प्रवाशांचा जीव जाण्याची शक्यता होती. मात्र, दरीतील एका झाडाला धडकून एसटी बस तिथेच अडकून पडली. यानंतर बचावपथकांनी घटनास्थळी धाव घेऊन एसटी बसमधील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले.
 
या बसमध्ये चालक आणि वाहकासह एकूण ४१ प्रवासी होते. सुदैवाने अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. ३० प्रवाशी जखमी झाले आहेत. तर ७ जणांना मोठी दुखापत झाली आहे. त्यांच्यावर प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच अपघातग्रस्त बस क्रेनच्या साहाय्याने सकाळी साडे दहाच्या सुमारास दरीतून बाहेर काढण्यात आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0