मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढण्याचा नारा उबाठा गटाने दिला आहे. उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिल्याचे संजय राऊतांनी शनिवार, ११ जानेवारी रोजी सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीत फाटाफूट झाल्याची शंका उपस्थित करण्यात येत आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "मुंबईसह नागपूरपर्यंतच्या सर्व निवडणूका आम्ही स्वबळावर लढणार आहोत. काय होईल ते होईल. आम्हाला एकदा आजमावायचे आहे. उद्धवजींनी आम्हाला तसे संकेत दिले आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये लोकसभा, विधानसभेत कार्यकर्त्यांना ती संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतींमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करायचे आहेत," असे ते म्हणाले.